‘लबाड लांडगा ढोंग करतोय, निर्णय घ्यायचं म्हटलं की सोंग करतोय’;उद्धव ठाकरेंवर नवनीत राणा यांची खरमरीत टीका

| Updated on: Jun 09, 2022 | 3:23 PM

महागाईवरून गरळ ओकणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची चेष्टा केली आहे. डिझेल आणि पेट्रोलवरचा कर कमी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे या सरकारने सामान्य जनतेची चेष्टा केली आहे असंही त्या म्हणाल्या.

लबाड लांडगा ढोंग करतोय, निर्णय घ्यायचं म्हटलं की सोंग करतोय’;उद्धव ठाकरेंवर नवनीत राणा यांची खरमरीत टीका
औरंगाबाद सभेनंतर नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Follow us on

औरंगाबादः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा झाल्यानंतर भाजप नेत्यांसह खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ओवैसीला अटक करण्याची हिम्मत ठाकरेंमध्ये नाही असे म्हणत त्यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण (Naming Sambhajinagar) तुम्हा कधी करणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या सभेतून जनतेला काय मिळालं तर भोपळा.

यावेळी त्यांनी पाणी प्रश्नाविषयीही सवाल उपस्थित करुन त्यांनी औरंगाबाद पाणी प्रश्नावरही उद्धव ठाकरे यांना छेडले.

शिवसेना ‘लबाड सेना’

यावरुन त्या म्हणाल्या की, आज वाटलं होतं उद्धव ठाकरे संभाजीनगरचा पाणी प्रश्न मिटवतील पण त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, नंतर वाटलं औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करतील पण त्यावरही निर्णय घेतला नाही. असे म्हणत त्यांनी सरदारच लबाड असल्यामुळे शिवसेना ‘लबाड सेना’ बनली आहे अशी खरमरीत टिकाही उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली.

शून्य निर्णयक्षमता असलेला मुख्यमंत्री

‘लबाड लांडगा ढोंग करतोय निर्णय घ्यायचं म्हटलं की सोंग करतोय.’ शून्य निर्णयक्षमता असलेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल अशी टीका करत उद्धव ठाकरे यांच्या निर्णय क्षमतेवरच त्यांनी सवाल उपस्थित करुन निर्णय घेण्याचे ते फक्त सोंग करतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ओवैसींवर ठाकरे सरकार मेहरबान का?

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना औरंगाबादमधील औरंगजेबच्या कबरीचा प्रश्न उपस्थित केला. यावरुन त्यांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेबचा एवढा पुळका का आहे, अन् औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यां ओवैसींवर ठाकरे सरकार मेहरबान का आहे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ओवैसींना अटक करण्याची हिम्मत

त्याबरोबरच संभाजीनगर नामकरण करण्याची इच्छा ठाकरेंची नाहीच शिवाय ओवैसींना अटक करण्याची हिम्मतही उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही असा टोलाही त्यांना लगावला आहे.

ठाकरे सरकारकडून जनतेची चेष्टा

महागाईवरून गरळ ओकणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची चेष्टा केली आहे. डिझेल आणि पेट्रोलवरचा कर कमी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे या सरकारने सामान्य जनतेची चेष्टा केली आहे असंही त्या म्हणाल्या.

कलंक दूर करण्यासाठी दुग्धाभिषेक

हनुमान चालिसा पठन केल्यामुळे आमच्यावर राजद्रोहा सारखा गुन्हा दाखल करण्यात आला.हा कलंक दूर करण्यासाठी दुग्धाभिषेक आम्ही केला आहे. पण आता तुमचा पापाचा घडा भरत आला आहे. तुम्ही केलेलं हे पाप गंगेत न्हाहूनही धुतलं जाणार नाही एवढं लक्षात ठेवा अशी टीका त्यांनी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविषयी केली आहे.

घराबाहेर न पडण्याचा वर्ल्ड रेकॅार्ड

ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याचं आश्वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे घराबाहेर न पडण्याचा वर्ल्ड रेकॅार्ड तेवढा केला आहे. शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला तरी उद्धव ठाकरेंच्या संवेदना जागा झाल्या नाहीत हे दुर्देव असल्याची टीका नवनीत राणा यांच्यावर केली आहे.