मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक
मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता भाजपकडून देखील आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. काँग्रेसकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं, तब्बल तीन तासांनंतर त्यांची सुटका झाली. दरम्यान राहुल गांधी यांच्या या आंदोलनानंतर आता भाजप देखील चांगलंच आक्रमक झालं आहे. देशभरतात ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये वातावरण चांगलंच तापलं असून, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपने काँग्रेसविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
साटम यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी या देशात अराजकता पसरवण्याचा वीडा उचलला आहे. स्वत:चं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता या देशात आग पेटवण्याचा प्रयत्न राहुल गांधींकडून सुरू आहे. राहुल गांधींच्या, काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या या नकारात्मक आणि घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो, असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. माझं राहुल गांधी यांना चॅलेंज आहे, त्यांनी आपला पासपोर्ट दाखवावा, त्यांनी कोणत्या देशात केव्हा आणि कुठे देशाच्या शत्रूंची भेट घेण्यासाठी परदेश वारी केली होती. याचा तपशील त्यांनी उघड करावा, असंही यावेळी अमित साटम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भारत आर्थिक महासत्ता होत आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारतविरोधी शक्तींनी भारताला रोखण्याकरता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी भारतविरोधी शक्तींनी रचलेलं हे कट कारस्थान आहे, असा आरोपही यावेळी साटम यांनी केला आहे.
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
दरम्यान राहुल गांधी यांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, काँग्रेसकडून देखील आता जोरदार आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.