मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा (MP Navaneet Rana) आणि रवी राणा राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, राज्यपालांना भेटण्यासाठी माझ्याकडे अनेक विषय आहेत, आणि सर्व विषय महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांवर मी यावेळी चर्चा करणार आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबतही चर्चा करणार असून आगामी बीएमसी निवडणुकीत (BMC Election) नवनीत राणा मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला आणखी रंगत येणार आहे.
नवनीत राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेय यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती.
त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत असल्याने आणि त्यांनी मुंबईची कन्या म्हणून मी या प्रचारात उतरणार असल्याचे सांगितल्यानंतर राजकीय घडामोडींना आता आणखीच रंग चढणार असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, जो निकाल राज्यसभा निवडणुकीत लागला आहे तोच निकाल महापालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही लागणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्विवाद भाजपचीच सत्ता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार नवनीत राणा यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्यापालांच्या भेटीसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणुकीच्या विजयाबाबत त्यांनी शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी त्यांनी राजकारणातील घडामोडींविषयी आणि आगामी विधानपरिषद आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीबाबत कोणती रणनिती आखणार याबाबतही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली.
भाजपने ज्या प्रमाणे राज्यसभेत विजय मिळवला आहे त्याच प्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही मोठा विजय भाजपचाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे राज्यसभेचे कोल्हापुरचे उमेदवार संजय पवार हे फक्त मतविभाजन झाल्यामुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीवेळीही घोळ होण्याची शक्यता भाजपचे काही नेते मंडळी करत आहेत. यावेळी नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा सांगितले की, गुप्त मतदान असल्याने शिवसेनेचे 50 टक्के आमदार भाजपला मतदान करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर दिल्लीसह महत्वाच्या वेगवेगळ्या शहरांमधून आंदोलन करण्यात आले होते. त्यावरही नवनीत राणा यांनी टीका करत त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही यंत्रणा करत आहे. त्यामुळे राजभवन वर आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर सर्व काही समोर येईल अशी टीकाही त्यांनी काँग्रेस पक्षावर केली.