
“केवळ मराठी नाही तर, इतर भाषिक लोक देखील मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मुंबई सेफ ठेवायची असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही. या हेतूने मतदान सुरू आहे. याचा मला आनंद आहे” असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. “बोटाची शाई पुसल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, लोकांचा मतदान प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालल्याचं मला दुर्देवाने बोलायला लागतय. सरकार आपल्या फायद्याचं कसं होईल यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत आहे” असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला.
“आता ते पाडू मशीन आणलं. मला कळत नाही व्हीव्हीपॅट मशीन काढलं आणि हे पाडू मशीन आणलं. आम्ही म्हणतो व्हीव्हीपॅट लावा. आता काल हे मशीन आणण्याचं काय गरज होती?. लांडी लबाडीने आपल्याला मतदान कसं होईल यासाठी या क्लृप्त्या लावल्या जात आहेत. त्यामुळे याच्यावरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. मला पूर्ण खात्री आहे ठाकरे बंधू हे महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतील” असा बाळा नांदगावकर म्हणाले.
आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?
दुबार मतदारांना पकडण्यासाठी भगवा गार्ड बनवण्यात आलय. त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “प्रशासनाने कितीही विरोध केला तरी त्यांनी त्यांचं काम करावं. आम्ही आमचं काम करत आहोत” “तुम्ही चुकीच्या गोष्टी करणार, अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन, यंत्रणेला हाताशी घेऊन तर आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?” असा आक्रमक प्रश्न बाळा नांदगावकर यांनी विचारला. “आम्ही बघणार काय करायचं ते, आमची फौज तयार आहे आणि दुबार मतदार जर आले तर त्यांना सटकवून काढायला आम्ही कमी करणार नाही” अशी आक्रमक भाषा नांदगावकर यांनी केली.
सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असली पाहिजे
“आम्ही आमच्यापरीने जे काही शक्य आहे ते करतोय. ही काही चांगली लोकशाहीची लक्षण नाहीत. या असल्या निवडणुका देशात होणं, अशा फ्रॉड निवडणुकीमधून सत्तेवर येणं याला निवडणूक म्हणत नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असली पाहिजे” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.