माटुंगा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

| Updated on: Nov 08, 2019 | 8:33 AM

अवकाळी पावसामुळे आधीच रेल्वे वाहतुकीची गती मंदावली होती. त्यातच मध्य रेल्वेवरील मांटुगा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक आणखी विस्कळीत झाली.

माटुंगा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
Follow us on

मुंबई : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला झोडपून काढलं (Mumbai Rain). मुंबईसह उपनगरांमध्ये गुरुवारी रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे, मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली (Central Railway). शुक्रवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक 30-35 मिनिटे उशिराने सुरु आहे (Local Delays).

अवकाळी पावसामुळे आधीच रेल्वे वाहतुकीची गती मंदावली होती. त्यातच मध्य रेल्वेवरील मांटुगा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक आणखी विस्कळीत झाली. सकाळी कामावर जायची वेळ असल्याने चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील अप धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे, मध्य रेल्वेवरील सर्व गाड्यांची वाहतूक 30-35 मिनिटं उशिराने सुरु आहे. लोकल गाड्या प्रत्येक दोन स्टेशनच्या मध्ये थांबवल्या जात असल्याने चाकरमान्यांना मनस्ताप झाला आहे.

लोकल गाड्यांसोबतच मुंबईहून जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांवरही या तांत्रिक बिघाडाचा मोठा परिणाम झाला आहे. एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूकही तब्बल 20-25 मिनिटे उशिराने होत आहे. तशा घोषणा प्रत्येक रेल्वे स्थानकावर करण्यात येत आहेत. दरम्यान, हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे मध्य रेल्वे प्रयत्न करत आहे.