शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे, कसा साजरा करावा, तुम्हीसुद्धा कळवा

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती,एक सुवर्णक्षण होता .

शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे, कसा साजरा करावा, तुम्हीसुद्धा कळवा
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Jitendra Zavar | Updated on: Mar 04, 2023 | 4:46 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्यास २०२४ मध्ये ३५० वर्षे होत आहे. त्यासाठी शासनाने आतापासून तयारी सुरु केली आहे. यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करणार आहे. हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांकडून कल्पना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक मेल आयडी दिला. त्यावर आपल्या कल्पना पाठव्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे पत्रात


यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा, महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत.
बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली. हा सगळा संघर्षपूर्ण कालखंड म्हणजे महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा, दिव्यत्वाचा, अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार होय.

सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर आणि विश्वासावर झालेली ही वाटचाल म्हणजे भावी पिढ्यांसाठी कोरल्या गेलेली प्रेरणागाथाच होय. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती,एक सुवर्णक्षण होता .

या क्षणाने मराठी माणसाच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली,सामान्य माणसांच्या शक्तीने मदांध सतेला आव्हान दिल्या जावू शकते हा विश्वास महाराष्ट्रीयांच्या मनात रुजवल्या गेला,अनेक शतकांचे दास्य निखळून पडले आणि महाराष्ट्र धर्माची पुनःस्थापना झाली.या क्षणाने महाराज छत्रपती झाले,शिवराज्यभिषेक शकाचा प्रारंभ झाला,महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली.

शिवराज्याभिषेक महोत्सव


सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शक ३५० हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेंव्हा दिनांक २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल.

या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे ,त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे,त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे हा दैवी योग तर साध्य होईलच पण यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल. त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहिल असा विश्वास वाटतो. शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत आहे.

या ठिकाणी पाठवा कल्पना

शिवराज्यभिषेक महोत्सव हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने आपण सूचना खालील मेलवर पाठवाव्या.
min.culture@maharashtra.gov.in यावर सूचना पाठविल्यास शासनातर्फे त्यांचा अवश्य विचार करण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us