नियतीने हात दिले नाही, पण अफाट जिद्द दिली, मुख्यमंत्री या लेकराला पाहून भारावले

| Updated on: Jul 07, 2023 | 8:48 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 वर्षाच्या चिमुकल्याला मदत केली आहे. या चिमुकल्याला जन्मत: हात नाहीत. पण हा चिमुकला आपल्या पायाच्या बोटांनी लिहितो. त्याने मुख्यमंत्र्यांसमोर आपलं पूर्ण नाव कागदावर लिहून दाखवलं. हे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भारावले.

नियतीने हात दिले नाही, पण अफाट जिद्द दिली, मुख्यमंत्री या लेकराला पाहून भारावले
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज एका 9 वर्षीय चिमुकल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या चिमुकल्याला जन्मत: दोन हात नाहीत. पण त्याची जिद्द अफाट अशी आहे. तो आपल्या पायाच्या बोटांनी लिहितो. विशेष म्हणजे या चिमुकल्याचं भारतीय सैन्यात नोकरी करण्याचं स्वप्न आहे. त्याचं हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याला मदतीसाठी हातभार लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एकनाथ शिंदे लवकरच या चिमुकल्याला कृत्रिम हात बसवण्यात मदत करणार आहेत. त्यामुळे या चिमुकल्याला मोठी मदत होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी, वय अवघ 9 वर्ष असलेला गणेश इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याचं शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचा अपंगत्व थांबू शकले नाही.

चिमुकल्याची अवस्था पाहून मुख्यमंत्री अस्वस्थ, पण त्याची जिद्द पाहून…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामोर या चिमुकल्याने आपलं संपूर्ण नाव पायाने कागदावर लिहून दाखवलं. हे पाहून मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकीत झाले. खरंतर चिमुकल्याला दोन हात नसल्याने मुख्यमंत्री अस्वस्थ झाले. या चिमुकल्याने पायाच्या बोटांनी स्वत:चं नाव कागदावर लिहून दाखवलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याचं कौतुक वाटलं. मुख्यमंत्र्यांना खरंच या गोष्टीचं अप्रूप वाटलं.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी गणेशला अपंगत्व आहे, त्याला मदत करा, असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. पण सदर आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नसल्याने मंगेश चिवटे यांनी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घालून दिली.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गणेशची जबाबदारी

मुख्यमंत्र्यांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली. पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख रूपयांचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम पाय बसवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मोठा होऊन काय बनायचं आहे?” असा प्रश्न विचारला. त्यावर गणेशने खूप छान उत्तर दिलं. “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि दुश्मनांना गोळ्या घालायच्या आहेत”, असं गणेश म्हणाला. यावेळी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द दिला.