उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरण मोहीम सुरु, पहिल्या लसीच्या मानकरी कोण?

| Updated on: Jan 16, 2021 | 12:28 PM

आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईत पहिली, तर डॉ मनोज पासांगे यांना दुसरी लस मिळाली (Uddhav Thackeray COVID Vaccination)

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरण मोहीम सुरु, पहिल्या लसीच्या मानकरी कोण?
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या राज्यस्तरीय मोहिमेला सुरुवात झाली. मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित होते. लस आली म्हणजे संकट टळलेलं नाही, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. (CM Uddhav Thackeray BKC COVID Vaccination Program)

आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईत पहिली लस देण्यात आली. तर डॉ मनोज पासांगे यांना दुसरी लस मिळाली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही लस टोचली जात असताना कोरोना योद्ध्यांजवळ उभ्या होत्या. याआधी नायर रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत राहिलेल्या पेडणेकरांनी लस टोचण्याची तयारी दर्शवली होती.

कोरोना लसीकरण हे क्रांतिकारक पाऊल, मुख्यमंत्र्यांचे उद्गार

कोरोना लसीकरण हे क्रांतिकारी पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व कोरोना योद्ध्यांना मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी रुग्णांची संख्या प्रचंड होती. आपल्या कोविड योद्ध्यांनी चांगलं काम केलं. ते दिवस आठवल्यावरही अंगावर शहारे येतात, काहीच हाती नसताना आपण लढत होतो. तुम्ही सर्व होतात, म्हणून शक्य झालं. तुमच्यामुळे कोव्हिड सेंटर ओस पडले आणि ते ओस पडलेले राहोत, अशी मनोकामना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

लस आली असली तरी सर्वात उत्तम लस ही मास्कच आहे. मास्क घालणं आवश्यक आहे. लस आली म्हणजे संकट टळलेलं नाही, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.

नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावं: राजेश टोपे

पंतप्रधानांनी लसीकरणाबद्दलचा मौलिक संदेश देशाला दिला. आरोग्यमंत्री म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांनी लसीकरण करावं, असं आवाहन करतो. कोरोना लसीकरणात सर्वांचाच नंबर लागेल, कुणीही काळजी करण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

सर्वांना वाटतं की लस मिळावी, मात्र, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य माणसांचा क्रमांक आल्यावर लस घेणार, प्राधान्यक्रमानुसार जेव्हा लस मिळेल तेव्हा लस घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

लसीकरणाची गरज आहे, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. 8 लाख 50 हजार जणांची नोंदणी केली आहे. त्यामुळे 17 लाख 50 हजार डोस मिळणं गरजेचे आहे. राज्याला उर्वरित 7.5 लाख डोस मिळणं गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहिणार आहे, असंही टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोना लसीकरणात राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर

(CM Uddhav Thackeray BKC COVID Vaccination Program)