‘… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

| Updated on: Jun 06, 2021 | 5:18 PM

आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झालीय.

... तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांना काहीसं दिलासं देणारं वक्तव्य केलंय. “निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेनमधील नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन करा. येत्या काळात मुंबईतील कोविड बधितांची संख्या नियंत्रणात आली, तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देऊ,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं (CM Uddhav Thackeray comment on shooting of films and series in Mumbai amid corona).

राज्यभरातील कोविडच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच या संवादात निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले आहे. राज्यातील चित्रपट आणि वाहिन्यांवरील निर्मात्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मातोश्री निवास स्थान आणि दूरदृष्टी प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आली होती.

आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको

राज्यात गेल्या वर्षी कोविड विषाणूचा संसर्ग वाढल्याने गेल्या वर्षी प्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कोविड संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

राज्यात चित्रीकरणासाठी एसओपी तयार

कोरोनाची दुसरी लाट राज्यात पसरू लागल्याने सर्वप्रकारच्या चित्रीकरणावर महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी घातली होती. संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमा चित्रीकरण करता येणार

ज्या शहरांमध्ये, गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा रेट हा 5 ते 10 टक्क्यांमध्ये आहे तिथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण 40 टक्क्यांहून अधिक आहे. ते सर्वजण लेव्हल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाची चित्रीकरणे केली जाऊ शकतात. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. चित्रीकरण आखून दिलेल्या नियमांमध्ये करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक आहे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

आजच्या झालेल्या बैठकीत टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, के.माधवन, मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, भरत जाधव, सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, जे.डी.मजेठिया, अमित बहेल, झी समूहाचे पूनित गोयंका, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर,सतीश राजवाडे, निलेश पोतदार, संग्राम शिर्के, विजय केंकरे, शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी, अनिकेत जोशी, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, गौरव बॅनर्जी, मधू भोजवानी, राहुल जोशी, त्याचप्रमाणे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जरहाड, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आदी देखील सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Unlock Updates : वडेट्टीवारांकडन अनलॉकची घोषणा, पुणे आणि नाशिकमध्ये नव्या नियमांनी काय बदल होणार?

Mumbai Local : ठाण्यातील लॉकडाऊन हटवला, आता लोकल रेल्वे धावणार की नाही?

मोठी बातमी: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray comment on shooting of films and series in Mumbai amid corona