दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना

| Updated on: Aug 24, 2020 | 5:47 PM

अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray on Thane Corona) सांगितले.

दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Follow us on

ठाणे : कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही. त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. नुकतंच उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकींसाठी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. (CM Uddhav Thackeray on Thane Corona)

या बैठकीला नगरविकास मंत्री तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, सर्व मनपा आयुक्त, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक उपस्थित होते

“लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथीलता दिली आहे. तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करावे तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याच्या सूचना त्यांना प्रशासनाला केल्या.”

तसेच पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करु नका. ठाणे मुंबईला लागून आहे. गेले काही महिने कोरोनावर लक्ष दिले गेले. पण आता आपल्याला इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. पावसाळी आजारांना दुर्लक्ष करु नका. मजुरांअभावी अनेक कामे बंद आहेत. नागरिकांतील भीती कमी होत आहे. हळूहळू सर्व मूळ पदावर आणायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना दक्षता समिती प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी. जगजागृती मोहिम सातत्याने सुरु ठेवावी लागणार आहे. अनलॉक करताना समाविष्ट सुरक्षेचे नियम आणि मास्क वापरणे तसेच हात धुवत राहणे हेच अनलॉकवर औषध आहे. कंटेन्मेंट झोन तसेच ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. आपण आपले काम कर्तव्य भावनेने आणि निष्ठेने करा, अशा काही सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. (CM Uddhav Thackeray on Thane Corona)

संबंधित बातम्या : 

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी, परीक्षा होणार की नाही? विद्यार्थ्यांचे निर्णयाकडे लक्ष