उपमुख्यमंत्रीपदाची मागणी कुठून आली माहित नाही, पण एकत्र बसून चर्चा करु-काँग्रेस मंत्री

| Updated on: Feb 04, 2021 | 6:55 PM

काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. ही बातमी कुठून आली माहिती नाही. पण यावर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची मागणी कुठून आली माहित नाही, पण एकत्र बसून चर्चा करु-काँग्रेस मंत्री
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण? असा सवाल विचारला जात आहे. तसंच राज्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा सध्या सुरु आहे. पण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. ही बातमी कुठून आली माहिती नाही. पण यावर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.(Congress has no discussion on Deputy Chief Minister’s post, explains Aslam Sheikh)

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे. पण महाराष्ट्रात पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याचं उत्तर दिल्लीतून मिळेल, असंही अस्लम शेख यांनी म्हटलंय. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. तेव्हापासूनच पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असं बोललं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी गुरुवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदात रस?

सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसनं उपमुख्यमंत्रीपदामध्ये रस दाखवल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली.

राजीनाम्यानंतर नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

“पाणी वाहतं राहिलं तर ते स्वच्छ असतं. यापुढे आता पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारेल आणि त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पक्षाध्यक्षांनी जो आदेश दिला त्यानुसार मी तुमच्या सगळ्यांसमोर राजीनामा दिला. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण ते तीनही पक्षांचे हाय कमांड निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली (Nana patole reaction after resigns as Assembly Speaker).

“तीन पक्षांचं सरकार आहे. सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमानुसार सर्व ठरवण्यात आलं आहे. या सर्वांमागे राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं हीच या सरकारची भूमिका आहे”, असं नाना पटोले म्हणाले. “कोरोना काळात सरकारने चांगलं काम केलं आहे. विपरीत परिस्थितीत सरकारने चांगलं काम केलं आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

“ज्या खुर्चीला बसलो त्या खुर्चीला शंभर टक्के न्याय द्यायचा, अशी माझी भूमिका राहिलेली आहे. ती खूर्ची जनतेची असते. त्यामुळे त्या खुर्चीतून जनतेला न्याय मिळावं. ती खूर्ची जनतेसाठी कसं न्याय देते ते मी दाखवून दिलं आहे”, असं पटोले म्हणाले.

“आम्ही तिघं भांडण्यासाठी एकत्र आलेलो नाहीत. तर राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. ते आम्ही व्यवस्थित करत आहोत”, असं मत त्यांनी मांडलं.

“मी राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या अध्यक्ष असताना देशपातळीवर काम केलं आहे. मी या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये संघटनेचं काम केलं आहे. त्यामुळे घटनात्मक काम करायला आवडतं. पक्षाने मला त्यासाठी संधी दिली”, असं पटोले यांनी सांगितलं

“राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांसोबत चर्चा झालेली. इतर घटक पक्षांसोबत चर्चा झाली. मी त्यांचे आभारही मानले. विरोधी पक्षानेही सहकार्य केलं”, असंदेखील नाना पटोले यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर

Congress has no discussion on Deputy Chief Minister’s post, explains Aslam Sheikh