काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घ्यावं, लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री निधीत जमा करावा: नाना पटोले

| Updated on: May 01, 2021 | 3:07 PM

राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे. | Covid vaccination congress

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घ्यावं, लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री निधीत जमा करावा: नाना पटोले
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई: राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण (Covid vaccination) करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने हाती घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला हातभार लावण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजारच्या गोरगरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. (Congress leader Nana Patole on covid vaccination drive in Maharashtra)

ते शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोना हे देशावर आणि राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या पहावत नाही. या संकटाचा सामना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत असून केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असली तरी महाराष्ट्र सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर न सोडता 18 वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे. काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 5 लाख रुपये अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे.

‘काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांना लस मिळवून देण्यासाठी मदत करणार’

प्रत्येक जिल्ह्यात कोविड सहायता केंद्राची स्थापना करून गरजू रुग्णांना बेड्स मिळवून देणे, वैद्यकीय सहायता पुरवणे याबरोबरच रक्तदान शिबिरे आयोजित करून मदतीचे कार्य सुरु ठेवले आहे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःच्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. या सोबतच नोंदणी करून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

‘मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती निष्काळजीपणे हाताळली’

केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, अशी टीका नाना पटोले यांनी केली. सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही, “देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का”?, असा संतप्त सवाल केला. अनेक गावं स्मशान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे.

सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही 4.5 कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही, असेही पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या:

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी: संजय राऊत

Coronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज

लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती; अजितदादांचा केंद्राला टोला

(Congress leader Nana Patole on covid vaccination drive in Maharashtra)