काँग्रेसचा यूपीचा प्रयोग महाराष्ट्रातही, प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करणार!

| Updated on: Jan 14, 2022 | 5:26 PM

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात राबवलेल्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ या अभियानाला महाराष्ट्रातून बळ देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

काँग्रेसचा यूपीचा प्रयोग महाराष्ट्रातही, प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करणार!
NANA PATOLE
Follow us on

मुंबई: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात राबवलेल्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ या अभियानाला महाराष्ट्रातून बळ देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळेच राज्यातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तशी घोषणाच केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची घोषणा केली आहे. काँग्रेसने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली आहे. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन महिला भगिणींना मकरसंक्रांतीची भेट देत असल्याची घोषणा पटोले यांनी केली आहे.

क्रांतीकारक निर्णय

महिलांना राजकीय प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतीकारी निर्णयही काँग्रेसच्या सरकारनेच घेतला होता. आताही उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा क्रांतीकारी निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस व उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांनी घेतला आहे. त्याची अमंलबजावणीही सुरू केली आहे. काँग्रेसच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देऊन त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. ‘लडकी हूँ’ लड सकती हूँ’, अशी घोषणा देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे, असं पटोले म्हणाले.

निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणार

महाराष्ट्रालाही मोठी परंपरा लाभलेली असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्थानिक पातळीवर महिलांना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांचा राजकारणातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग आणखी वाढावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

घातपाताचा मोठा कट उधळला! दिल्लीत बॅगमध्ये आढळलेल्या आयईडी बॉम्बचा खरा सूत्रधार कोण?

VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

‘तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरेंनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा’, चंद्रकांत पाटलांची पुन्हा मागणी