Nana Patole : काँग्रेसचा महागाई, जीएसटी, बेरोजगारी व अग्निपथला विरोध, शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार

| Updated on: Aug 04, 2022 | 2:42 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उद्या सकाळी 11 वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल. त्यानंतर जेलभरो केले जाणार आहे.

Nana Patole : काँग्रेसचा महागाई, जीएसटी, बेरोजगारी व अग्निपथला विरोध, शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार
शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार
Follow us on

मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला. जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. महागाई, बेरोजगारी (Unemployment) व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. उद्या शुक्रवार 5 ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार आहे. त्यानंतर जेलभरो (Jail Bharo) करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (Pradesh Congress Committee) अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे.

अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध

मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. मागील 45 वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. 2014 ते 2022 पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी 22 कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ 7 लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त 4 वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध आहे. काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा व महापुरुषांचा अवमान करत असतात. मुंबईबद्दल बोलूनही त्यांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. त्यांच्या बोलण्यातून भाजपा व आरएससची शिकवणच नेहमी दिसून येते.

हे सुद्धा वाचा

उद्या सकाळी 11 वाजता राजभवनाला घेराव

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उद्या सकाळी 11 वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल. त्यानंतर जेलभरो केले जाणार आहे. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतील.