Corona vaccination : कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्रिसूत्रीचं पालन करा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

| Updated on: Jan 16, 2021 | 12:32 PM

वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली.

Corona vaccination : कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्रिसूत्रीचं पालन करा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Follow us on

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर मुंबईत राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली. त्यावेळी कोरोनाची लस आली असली तरी त्रिसूचीचं पालन करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.(CM Uddhav Thackeray inaugurates statewide vaccination drive)

लसीकरणाचा क्रांतीकारी दिवस उजाडला असला तरी अद्याप संकट टळलेलं नाही. सर्वांना लस मिळेपर्यंत काही महिने लागणार आहेत. या लसीचा किती दिवस प्रभाव राहील हे कळायचं आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, हात धुणे आणि अंतर पाळणे या त्रिसूत्री वापर होणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आपण या त्रिसूत्रीद्वारेच कोरोनावर मात करत आहोत. त्यामुळे या त्रिसूत्रीचं पालन केलं नाही तर संकट पुन्हा येऊ शकतं, अशी भीतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

‘कोविड सेंटर ओस पडलेलेच राहू दे’

राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचं उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील कोविड केअर सेंटरमध्ये केलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात या कोविड सेंटरमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण उपचार घेत होते. पण आता या कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या अगदी थोडकी आहे. त्यावरुन मागील दिवस आठवल्यावर अंगावर शहारे येतात. हाती काहीच नसताना आपण लढत होतो. तुम्ही सर्वजण होता म्हणून ते शक्य झालं. तुमच्यामुळे कोविड सेंटर ओस पडले आणि ते ओस पडलेलेच राहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे एकप्रकारे आभार मानले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

कोरोना महामारीपासून सर्व देशवासियांना दिलासा देणाऱ्या आणि जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाच का लस दिली जात आहे, याचं कारण सांगितलं. प्रत्येक रुग्णाला वाचवण्याच्या प्रयत्नात काही डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, अॅम्ब्युलन्स चालक आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील काहींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसऱ्याला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

संबंधित बातम्या :

PM Narendra Modi : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

Corona Vaccination : भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह, अफवांना बळी पडू नका- पंतप्रधान

CM Uddhav Thackeray inaugurates statewide vaccination drive