UPI च्या माध्यमातून मुंबईत लोकांना करोडोंचा चुना, पेमेंट करताना तुम्ही ही चूक करु नका

| Updated on: Mar 29, 2023 | 1:34 PM

UPI च्या माध्यमातून व्यवहार करण्याचं प्रमाण वाढत आहे. पण सोबत सुरक्षेचा मुद्दा ही ऐरणीवर आला आहे. कारण लोकांना ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार आता वाढत आहेत.

UPI च्या माध्यमातून मुंबईत लोकांना करोडोंचा चुना, पेमेंट करताना तुम्ही ही चूक करु नका
Follow us on

मुंबई : भारतात युनिफाइड पेमेंट इंटरफेस ( UPI ) माध्यमातून व्यवहार खूप वेगाने वाढत आहेत. फोन हातात घेतला की काही सेकंदात पैसे ट्रान्सफर. मग बिल भरणे असो किंवा काही खरेदी किंवा तिकीट बुक करणे असो. या सर्व कामांसाठी आता UPI अॅप्सचा वापर केला जातो. ऑनलाईन सुविधा वाढल्या आहेत. पण त्यासोबत आर्थिक फसवणूकही झपाट्याने वाढली आहे. सायबर गुन्हे वाढत आहेत. लोकांची फसवणूक करण्याचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. ज्याला लोकं बळी पडत आहेत. मुंबईतून असाच एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

करोडो रुपयांवर डल्ला

मुंबईत 81 जणांची 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पुढे आले आहे. नुकत्याच आलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. सायबर ठग लोकांची फसवणूक करतात. त्यानंतर त्यांच्या पैशांवर डल्ला मारतात. मुंबईतील 81 लोकांच्या खात्यातून तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

फसवणूक कशी होते?

सायबर ठग सुरुवातील UPI द्वारे लोकांच्या खात्यात काही पैसे पाठवतात. यानंतर ते लोकांना फोन करून पैसे चुकून पाठवल्याचे सांगतात आणि त्यांना ते परत करण्याची विनंती करतात. जर तुम्ही त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले तर तुमच्या बँकेचे सर्व तपशील जसे की KYC संबंधित माहितीसह तुमचा पॅन आणि आधार तपशील देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतात. यासाठी सायबर ठग एक प्रकारचे मालवेअर वापरतात. त्यानंतर ते तुमचे बँक खाते पूर्णपणे हॅक करून ते त्यांच्या ताब्यात घेऊ शकतात.

फसवणूक कशी टाळायची?

सध्याची अँटी-मालवेअर यंत्रणा किंवा सॉफ्टवेअर हा प्रकार पकडू शकत नाही. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या अशा कॉलला आपण बँकेची कुठलीही माहिती देऊ नये. असे फोन आले तर तुम्ही त्यांना त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात येऊन पाठवलेले पैसे जमा करण्यास सांगू शकता. UPI द्वारे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्क्रीनशॉट पाठवू नये.