दिल्लीची हवाच नाही तर पाणीही दूषित, देशात मुंबईचं पाणी सर्वोत्तम

| Updated on: Nov 17, 2019 | 10:05 AM

पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या भारतीय मानक ब्यूरोचा (बीआयएस) एक अहवाल समोर आला, यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं पाणी देशात सर्वात शुद्ध, तर दिल्लीचं पाणी सर्वाच दुषित असल्याचं समोर आलं

दिल्लीची हवाच नाही तर पाणीही दूषित, देशात मुंबईचं पाणी सर्वोत्तम
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीची हवा तर प्रदूषित आहेच, पण आता दिल्लीच्या लोकांना हवेसोबतच दूषित पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावं लागणार आहे (Delhi Water Is Contaminated). वायू प्रदुषणग्रस्त असलेल्या दिल्लीवासियांना शुद्ध पाणी मिळणंही आता कठीण झालं आहे. पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या भारतीय मानक ब्यूरोचा (बीआयएस) एक अहवाल समोर आला, यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं पाणी देशात सर्वात शुद्ध, तर दिल्लीचं पाणी सर्वात दूषित असल्याचं समोर आलं (Delhi water fails in BIS test).

बीआयएसने दिल्ली-मुंबईसोबतच भारताच्या 20 राज्यांच्या राजधानीमध्ये नळाच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासली. यादरम्यान, मुंबईचं पाणी हे देशात सर्वात शुद्ध असल्याचं आढळलं (Mumbai Water), तर दिल्लीला या यादीत शेवटचं स्थान मिळालं.

बीआयएसने दिल्लीच्या 11 वेगवेगळ्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित केले. या 11 नमुन्यांपैकी सर्व नमुने शुद्धतेच्या विविध मानकांवर अपयशी ठरले. तर मुंबईतील 10 ठिकाणांहून संकलित करण्यात आलेले सर्वच्या सर्व 10 नमुने हे शुद्धता मानकांनुसार योग्य असल्याचं समोर आलं.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी (16 नोव्हेंबर) बीएसआयच्या तपासणीनंतर पिण्याच्या पाण्याच्या या नमुन्यांचा अंतिम अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी देशाची राजधानी दिल्लीला जल मंडळाकडून पुरवठा केलं जाणारं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं सांगितलं.

“पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या संदर्भात, दिल्लीतील 11 ठिकाणाहून पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. सुरुवातीच्या तपासणीत हे नमुने अयशस्वी ठरल्यानंतर आम्ही देशातील विविध शहरांमध्ये नळाद्वारे पुरवल्या जाणार्‍या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला”, अशी माहिती रामविलास पासवान यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात दिल्लीचे पिण्याच्या पाण्याचे नमुने संकलित केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशातील 20 राज्यांतील राजधानींमधील विविध स्थानांवरुन पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले. या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेनुसार या शहरांना प्राधान्यक्रमाने दर्शवण्यात आलं आहे. यामध्ये मुंबई हे पहिल्या स्थानावर आहे, तर हैद्राबाद आणि भूवनेश्वर हे दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर रांची, चौथ्या स्थानावर रायपूर आहे. पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर अनुक्रमे अमरावती, शिमला, चंदीगड आणि त्रिवेंद्रम आहे. या यादीत नवव्या स्थानावर पाटणा आणि भोपाळ आहे.

बीआयएसच्या यादीत दहाव्या स्थानावर गुवाहाटी, बंगळुरू आणि गांधीनगर आहे. तर लखनऊ आणि जम्मू हे अकराव्या स्थानावर आहेत. 12 व्या स्थानावर जयपूर आणि देहरादून आहे. तर चेन्नई 13 व्या स्थानावर आणि कोलकाता 14 व्या स्थानावर आहे. सर्वात शेवटच्या 15 व्या स्थानावर दिल्ली आहे.

तिसऱ्या टप्प्यात उत्तर पूर्व राज्यातील राजधानी आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे नामांकित करण्यात आलेल्या स्मार्ट शहरांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्रायलाने दिली. या नमुन्यांचा अहवाल 15 जानेवारी 2020 पर्यंत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चौथ्या टप्प्यात देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये नळामार्फत पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाणाचे नमुने संकलित करुन त्यांची तपासणी केली जाईल. याचा अहवाल 15 ऑगस्ट 2020 पर्यंत येणार असल्याचं रामविलास पासवान यांनी सांगितलं.