सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधान परिषदेत 3 मोठ्या घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. याचीच दखल अजित पवार यांनी घेतली आहे.

सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधान परिषदेत 3 मोठ्या घोषणा
Image Credit source: tv9
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 24, 2023 | 7:15 PM

मुंबई | 24 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पुरात अनेकजण वाहून गेली. तसेच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचं घरादाराचं नुकसान झालं. या सगळ्या घटनांची गंभीर दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांनी आज विधान परिषदे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

“१९ जुलैला राज्याच्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीजनक पाऊस पडला. यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. यवतमाळमध्ये ११० नागरिकांना एनडीआरएफने बाहेर काढले. मदतीसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली”, असं अजित पवार विधान परिषदेत म्हणाले.

अजित पवार यांच्या तीन घोषणा नेमक्या कोणत्या?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत आज राज्यातील पूरपरिस्थितीवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. पूरग्रस्तांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत करणार. दुकानांचं नुकसान झाल्यास 50 हजारांची मदत केली जाणार आणि पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत दिली जाईल.

अजित पवार यांच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाला 11 महत्त्वाचे निर्देश

  • धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.
  • शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत.
  • ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत.
  • बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.
  • ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी.
  • रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.
  • ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात.
  • गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.
  • ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी.
  • पुरामुळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे.

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?

“बुलढाणा जिल्ह्यात १०२ मिलीमीटर पाऊस पडला. तेथे नदी-नाल्यांना पूर आला होता. वाशिममध्ये १३९.७ मिलीमीटर पाऊस पडला. वेगवेगळ्या जिल्ह्यात मदतकार्य पथक ही तैनात करण्यात आली”, अशी माहिती अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली.

“या अवकाळी पावसात मृत पावलेल्यांना तातडीने ४ लाखाची मदत जाहीर केलीय. तातडीने पिक पंचनामेचे काढण्याचे निर्देश दिले आहेत. पुरात घराचं नुकसान झालेल्यांना 5 ऐवजी 10 हजारांचं सानुग्रह अनुदान मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे”, असं अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितलं.

“धोकादायक परिस्थितीत असलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं. पूरपरिस्थितीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने 4 लाखांची मदत देण्यात यावी. शेती-पिकांच्या नुकसानीचे पंचवाने तातडीने घ्यावेत”, असे निर्देश दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

“शेतजमीन खरडून गेल्या असतील तिथे पंचनामे करुन पुन्हा त्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी निर्णय घ्यायचा. बाधित व्यक्तींना दुकानात स्वस्त दरात धान्याचं वाटप करावं”, असेही निर्देश दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

“ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं त्यांना सध्याच्या दराने 5 हजारने सानुग्रह देण्याची कारवाई सुरु करायची, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सानुग्रह 10 हजार देण्याचा आताच निर्णय घेण्यात आला”, असं अजित पवार विधान परिषदेत स्पष्ट म्हणाले.

Follow Us