‘उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या’, देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान

| Updated on: Nov 28, 2022 | 8:33 PM

"उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या, देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विरोधात रोखठोक पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा भावूक चेहरा कॅमेऱ्यातही कैद झालेला बघायला मिळाला. उदयनराजे यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी पदमुक्त व्हावं लागणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“उदयनराजे यांच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भावनेतून बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“शेवटी राज्यपाल हे पद संवैधानिक पद असतं. ते सरकारच्या हाती नसतं. सरकार त्यात काही करु शकत नाही. राज्यपालांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रपतींचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की, उदयन महाराज हे समजून घेतील. पण त्यांच्या भावनेच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

“छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं प्रेरणास्त्रोत दुसरं कोणी असूच शकत नाही. आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत तेच आहेत. महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श तेच आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचं राज्यपालपद नकोय?

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाच आता महाराष्ट्राचं राज्यपालपद नकोय, अशी भावना खुद्द त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिल्याची बातमी समोर आली होती. पण त्यानंतर राज्यपाल भवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं.

राज्यपालांच्या पदमुक्तीचं वृत्त खोटं आहे. राज्यपालांनी पाच ते सहा महिन्यांपूर्वी पदमुक्तीबाबत चर्चा केली होती, अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आलीय. राज्यपालांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेमुळे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, असं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.