EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

| Updated on: Mar 24, 2020 | 5:30 PM

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियम न पाळणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा हिसका दाखवण्याचे आदेश दिले आहेत (Anil Deshmukh on strict Police action).

EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
Follow us on

मुंबई : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि जमावबंदी लागू करुनही न ऐकणाऱ्यांवर आता थेट पोलिसी स्टाईलने कारवाई होणार आहे. स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियम न पाळणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा हिसका दाखवण्याचे आदेश दिले आहेत (Anil Deshmukh on strict Police action). ते कोरोनाच्या नियंत्रणाबाबत सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना टीव्ही 9 मराठीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी आता विनंती करुन झाली, यापुढे पोलिसी काठीचा हिसका असं म्हणत कारवाईचा इशारा दिला.

अनिल देशमुख म्हणाले, “आता आमची सीमा संपली आहे. आम्ही मागील 8 दिवसांपासून वारंवार विनंती करतो आहे. त्यामुळे आता मी गृहमंत्री म्हणून सर्व पोलिसांना सांगतो की आपली विनंती करुन झालं आहे, आता जे कोणी 5 ते 10 टक्के शासनाच्या सूचनांप्रमाणे सहकार्य करत नाहीत, त्यांना आपल्या काठीचा हिसका दाखवा. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात याची अंमलबजावणी करावी. याशिवाय ही सहकार्य न करणारी काही मंडळी रस्त्यावर येणं थांबवणार नाही.”


सरकारच्या सूचना न पाळण्यात उच्च शिक्षित लोकही आहेत. त्यांनाही याचं गांभीर्य कळत नाही याचं दुःख आहे. ज्यांचं शिक्षण नाही त्यांचं मी थोडं समजू शकतो, मात्र तरीही ते शाहण्यासारखे वागत आहेत. मात्र, जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यातील अनेक लोक सहकार्य करत नाहीत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे शिकलेला असो अथवा नसो त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल. पोलिसांना जी कारवाई करायची आहे त्याची त्यांना पूर्ण परवानगी दिली आहे. त्यांना त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, असंही अनिल देशमुख यांनी नमूद केलं.

नागरिकांनी सहकार्य केलं नाही, तर आपली स्थिती इटलीसारखी होईल

अनिल देशमुख म्हणाले, “आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 100 च्या वर गेली आहे. त्यामुळेच राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी 31 मार्चपर्यंत असेल. जर सर्वांनी 31 मार्चपर्यंत सहकार्य केलं, तर आपण कोरोनाला चांगल्याप्रकारे नियंत्रित करु शकू. मात्र, लोकांनी जर सहकार्य केलं नाही, तर इटलीमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि भारतात देखील तयार होईल. हे टाळायचं असेल, तर राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं काटोकोरपणे पालन जनतेने केलं पाहिजे.”

भारताचे जे नागरिक परदेशात गेले होते, ते परत मायदेशी परत आले. त्यांना आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. जर त्यांच्यात कोरोनाचे काही लक्षणं दिसली नाही, तर त्यांना घरीच स्वविलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी अनेकांना त्यांच्या घरी राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यांना घरी वेगळं राहण्याबाबत इतकी समजूत दिली असतानाही अनेक रुग्ण बाहेर फिरताना दिसली. त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई केली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आली आहेत. जे रुग्ण कोरोना बाधित आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. फक्त त्यांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं अनिल देशमुख म्हणाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lock Down | ‘मैं समाज का दुश्मन हूं…’, संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून धडा

मुंबईत जमावबंदीचं उल्लंघन, हॉटेल, पान टपरी, फेरीवाले, 24 तासात 112 गुन्हे दाखल

सकाळी 7 ते 11 भाजी मार्केट सुरु, एकट्यानेच जा, संचारबंदी मोडणाऱ्यांना अजित पवारांची तंबी

संबंधित व्हिडीओ:


Anil Deshmukh on strict Police action