
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार बघायला मिळतोय. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात थेट अवकाळी पावसाचा इशारा दिला. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात थंडी फार काही नसणार असल्याचे अगोदरच भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामध्येच आता थेट अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. काल राज्यात अनेक भागात धूसर वातावरण बघायला मिळाले. यासोबतच वायू प्रदूषणही चांगलेच वाढले होते. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. श्वास घेण्यासही समस्या होत आहे. सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधित समस्या अधिक जाणवत आहेत.
भारतीय हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला. राज्यात सध्या उकाडा वाढला असून पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले. उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. थेट येलो अलर्टही पावसाचा जारी केलाय. फक्त उत्तर महाराष्ट्रच नाही तर राज्यातील इतरही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव या भागात जोरदार वारे आणि विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.
येलो अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, अहिल्यानंतर आणि ठाणे या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. केरळच्या किनाऱ्यालगत 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. राज्यात पुढील एक ते दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात सध्या पावसाला अनुकूल असे वातावरण आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे, राज्यात काही दिवसांपूर्वीच मोठा अवकाळी पाऊस झाला होता आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने थेट पावसाचा इशारा जारी केला. वातावरणात सातत्याने बदल होत आहे. डिसेंबर महिन्यात थंडी कायम होती. मात्र, जानेवारी महिन्यात सुरूवातीपासूनच तापमानात बदल होताना दिसला. 1 जानेवारीला मुसळधार पाऊस आला आणि त्यानंतर वातावरणात बदल झाला.