शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये जाणार का? अखेर जयंत पाटील यांनी मौन सोडलं

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा सुरू होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाण गेल्यानंतर काँग्रेसला जसा झटका दिला तसाच आता शरद पवार गटालाही बसतो की काय अशी चर्चा होती, अखेर यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये जाणार का? अखेर जयंत पाटील यांनी मौन सोडलं
Harish Malusare | Updated on: Feb 19, 2024 | 5:08 PM

मुंबई : आगामी निवडणुका जवळ येत असताना भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना गळाला लावत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी पंजाची साथ सोडत कमळ हातात घेतलं. भाजप मविआला खिंडार पाडण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसत आहे. आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याने वातावरण फिरल्यासारखं झालं आहे. अशातच शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसणार असल्याचं बोललं जात होतं. पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटाचा बडा नेता आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कमळ हातात घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर बोलताना जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मौन सोडलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

मी कुठेही जाणार नाही, मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही. कोणत्याही भाजप नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. अलीकडच्या काळात दिल्लीत गेलोच नाही त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच नाही. आमची सुप्रीम कोर्टात केस होती तेव्हा गेलो होतो त्यानंतर नाही गेलो त्यामुळे कोणतीही बैठक झाली नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. यावेळी जयंत पाटील यांना राजू शेट्टी मविआमध्ये येण्याबाबत विचारण्यात आलं होतं.

राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही मुद्दे मांडले त्यावर चर्चा सुरु आहे. आता आठ दिवस झाले चर्चा सुरु आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाल्या. तिन्ही पक्षात समन्वय झालेला आहे. सात आठ दिवसात निष्कर्ष येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी व्यापक स्वरूपात जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

कोण चर्चा करताय हे मी उलट घेतोय कारण आमची प्रसिद्धी होत आहे, रावेलसाठी खडसे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते पण त्यांची तब्येत ठीक नसल्याने दुसरा पर्याय शोधत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

Follow Us