Anand Dighe: हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे!; केदार दिघेंनी मुख्यमंत्र्यांना दिला मोर्चाचा इशारा

केदार दिघे यांच्या या ट्विटमुळे ठाण्यातील राजकारण हे आणखी तापणार असल्याचेच चित्र दिसत आहे. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी केले नसले तरी शिवसैनिकांनी मात्र बंडखोर आमदारांना गाड्या फोडण्याचा इशारा दिला आहे.

Anand Dighe: हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे!; केदार दिघेंनी मुख्यमंत्र्यांना दिला मोर्चाचा इशारा
महादेव कांबळे | Updated on: Aug 02, 2022 | 11:25 PM

मुंबईः सध्या राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे दौरे, आदित्य ठाकेर यांची निष्ठा यात्रा आणि शिवसैनिकांबरोबर होत असलेला उद्धव ठाकरे यांच्या संवादामुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. या घटना सुरू असतानाच आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुतण्यावर बलात्काराचा आरोप (Nephew Rape Case) करण्यात आल्याने आता ठाण्यातील शिवसैनिक आक्रमक होत जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल..! असा इशारा आता केदार दिघे यांनी ट्विट करुन दिला आहे. त्यामुळे हे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसत आहे.


आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

राज्यातील आजचा दिवस प्रचंड राजकीय घडामोडींनी प्रचंड चर्चेत राहिला आहे. पुण्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर काही तासातच माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करुन काच फोडण्यात आली असतानाच ठाण्यामध्ये आनंद दिघे यांच्या पुतण्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर

या सर्व घटनांनी आता शिवसैनिक आक्रमक होत शिवसेनास्टाईलने आंदोलन आणि क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. त्याच स्टाईलने आता केदार दिघे यांनीही ट्विट करत मुख्यमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. केदार दिघे या घटनेनंतर काही वेळात ट्विट करत हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे! असं म्हणत ठाणे हा शिवसेनेचा,दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई करत असाल आणि दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

ट्विटमुळे ठाण्यातील राजकारण आणखी तापणार

केदार दिघे यांच्या या ट्विटमुळे ठाण्यातील राजकारण हे आणखी तापणार असल्याचेच चित्र दिसत आहे. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी केले नसले तरी शिवसैनिकांनी मात्र बंडखोर आमदारांना गाड्या फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता या राजकीय घडामोडींचा शेवट काय होणार याकडेच साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us