केतकी चितळे प्रकरणात राज्य सरकारने कायदा गुंडाळून ठेवल्याचा आरोप, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, केतकीच्या वकिलांनी घेतली राज्यपालांची भेट

| Updated on: Jun 04, 2022 | 8:46 PM

सगळ्या तक्रारी घेऊन केतकी चितळेचे वकील थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले. या प्रकरणात राज्यपाल आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी केली आहे.

केतकी चितळे प्रकरणात राज्य सरकारने कायदा गुंडाळून ठेवल्याचा आरोप, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, केतकीच्या वकिलांनी घेतली राज्यपालांची भेट
Demand of CBI in Ketaki case
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale)ही गेल्या दोन आठवड्यांपासून जेलमध्ये आहे. एकाच गुन्ह्याखाली तिच्यावर राज्यात २२ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. फेसबुकच्या फॉरवर्ड पोस्ट (Facebook post)प्रकरणात अद्याप तिला जामीन मिळालेला नाही. कळंबोली पोलीस ठाण्यात ती पोलिसांच्या ताब्यात असताना तिच्यावर अंडी आणि शाई फेक करण्यात आली, यावेळी तिला मारहाणीचाही प्रयत्न झाला, मात्र पोलिसांसमोर घडलेल्या या कृत्याची साधी तक्रारही नोंदवून घेण्यात आली नाही. या सगळ्या तक्रारी घेऊन केतकी चितळेचे वकील थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले. या प्रकरणात राज्यपाल आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची (CBI enquiry)मागणीही केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी केली आहे. 

केतकीवरील अन्याय थांबवण्याची मागणी

केतकी चितळे हिला एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीसारखी वागणूक देत असल्याचे केतकीच्या वकिलांचे म्हणणे आहे. २२ ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल होणे, तिच्यावर हल्ला करणे, त्यानंतर हल्लेखोर महिलेने माध्यमांसमोर येऊन केलेल्या योजनेची माहिती देणे, हा सगळा नियोजनाचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतरही तिथे तिचा जामीन नाकारणे, तिच्या कोठडीत वाढ होणे, हेही कायद्याला धरुन नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात महाराष्ट्रात कायदा कोलमडून पाडण्यात आला असल्याचा त्यांचा दावा आहे. तिला कळंबोली पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी साधी तक्रारही नोंदवण्यात येत नसल्यने या प्रकरणी केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केल्याचे वकील देशपांडे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

केतकी प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी

केतकी चितळेवर तीन दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्याची कॉपीही अद्याप वकिलांना दिली नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तिच्यावर पोलिसांसमोर हल्ला होतो, ती बाहेर असती तर तिचे काय केले असते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारकडून हे जाणीवपूर्वक करण्यात येत असून, या प्रकरणात आता केंद्र सरकराने हस्तक्षेप करावा अशी मागणीही वकील योगेश देशपांडेंनी केली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. एकूणच आता केतकी चितळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.