गोवंडीतील 21 मुली बेपत्ता प्रकरण; राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, किरीट सोमय्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

| Updated on: Nov 23, 2020 | 8:02 PM

मुंबई पोलीस माहिती लपवत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या प्रतिक्रियेत केला आहे (Kirit Somaiya allegations on Mumbai Police).

गोवंडीतील 21 मुली बेपत्ता प्रकरण; राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, किरीट सोमय्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : गोवंडीतील 21 मुली बेपत्ता प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. गोवंडीत गेल्य अकरा महिन्यात 21 मुली बेपत्ता झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या  (Kirit Somaiya) यांनी दिली होती. याप्रकरणी मुंबई पोलीस माहिती लपवत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत केला आहे (Kirit Somaiya allegations on Mumbai Police).

“आज मी प्रत्यक्ष गोवंडी पोलीस स्टेशनचला जाऊन माहिती घेतली. यात आणखी धक्कादायक बाब अशी की, 8 मुली या अल्पवयीन आहेत. या सर्व मुली अविवाहीत होत्या. त्यांची फसवणूक करुन बाहेर घेऊन जाण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं”, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं (Kirit Somaiya allegations on Mumbai Police).

“गोवंडी परिसराच्या आजूबाजूला तीन पोलीस स्टेशन आहेत. पण शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये या वर्षात एकही अशा केसची घटना घडल्याची नोंद नाही. देवनार पोलीस स्टेशनमध्ये 4 तर मानखुर्दमध्ये 2 अशा एकूण फक्त 10 केसेसची नोंद पोलिसांकडे आहे. याचा अर्थ मुंबई पोलीस लपवत आहेत. गोवंडीत 21 मुली बेपत्ता होतात. पण मुंबई पोलीस जराही गंभीर नाहीत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

महाराष्ट्रात दररोज 105 मुली बेपत्ता होतात, एनसीआरबीकडून खुलासा

राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने (NCRB) 2019 मधल्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबतची धक्कादायक माहिती महिनाभरापुर्वी मांडली होती. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी 105 महिलांच्या बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात भयंकर बाब म्हणजे प्रत्येक दिवशी 17 महिलांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय स्तरावर बेपत्ता महिला आणि तस्करीच्या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सगळ्यात अव्वल आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालचा नंबर येतो.

2019 मध्ये तस्करीच्या शिकार झालेल्या 989 घटनांमध्ये 88 टक्के महिला आणि 6 टक्के लहान मुलं होती. मजूरी, अवयव तस्करी, ड्रग पेडलिंग, लैंगिक शोषण, जबरदस्तीने लग्न करणं इत्यादी कारणांसाठी मानवी तस्करी केली जाते. महाराष्ट्राच्या बाबतीत, 95.6 तस्करीचं कारण जबरदस्ती वेश्याव्यवसायातून लैंगिक शोषण करणं हेच समोर आलं आहे.

2019 आणि 2018 च्या आकडेवारीच्या तुलनेत बेपत्ता महिलांच्या घटनांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018 मध्ये सर्वाधिक बेपत्ता झालेल्या मुलांसह महाराष्ट्र पहिल्या 10 राज्यांच्या यादीत नव्हता. पण आता तब्बल 4,562 मुलं बेपत्ता झाल्यानंतर आपलं राज्य राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचलं आहे.

संबंधित बातमी : 

वर्षभरात मुंबईतल्या गोवंडीतील 21 तरुणी गायब, किरीट सोमय्यांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी