Breaking : मुंबईच्या मालाड अक्सा बीचवर मोठी दुर्घटना टळली, लाईफ गार्डने 12 लोकांचा जीव वाचवला
भुसावळ इथून फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील 12 लोक समुद्राच्या भरतीमध्ये उतरल्यामुळे बुडत होते. मात्र, बीचवर तैनात असलेल्या मुंबई महापालिकेचे लाईफ गार्ड भारत मानकर आणि त्यांच्या सहा जणांच्या टीमने या सर्वांना वाचवलं आणि सुखरुप किनाऱ्यावर आणलं.
मुंबई : मालाड पश्चिमेच्या अस्का बीचवर (Axa Beach) संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. भुसावळ इथून फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील 12 लोक समुद्राच्या भरतीमध्ये (Sea Tide) उतरल्यामुळे बुडत होते. मात्र, बीचवर तैनात असलेल्या मुंबई महापालिकेचे लाईफ गार्ड (Life Guard) भारत मानकर आणि त्यांच्या सहा जणांच्या टीमने या सर्वांना वाचवलं आणि सुखरुप किनाऱ्यावर आणलं. समुद्रात लोक बुडत असल्याचं पाहताच लाईफ गार्डनी समुद्रात उडी घेतली आणि बुडत असलेल्या 12 जणांना सुखरुपपणे बाहेर काढलं. लाईफ गार्डच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये समुद्रात खोल पाण्यात काही लोक दिसून येत आहेत. ते समुद्रात इतके आत गेले होते की त्यांची डोकी फक्त दिसत आहेत. समुद्र किनाऱ्यावरून काढण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक लोक दिसत आहेत. मात्र, कुणीही पुढे जाऊ शकत नव्हतं. तेव्हा मुंबई महापालिकेची लाईफ गार्डची टीम समुद्रात उतरली आणि त्यांनी बुडत असलेल्या 12 जणांना सुखरुपपणे किनाऱ्यावर आणलं. व्हिडीओमध्ये ही संपूर्ण घटना दिसत नसली तरी समुद्राला आलेली भरती आणि त्यात दूरवर काही लोकांना लाईफ गार्डची टीम वाचवताना पाहायला मिळत आहे.
खोल पाण्यात उतरणं धोकादायक
पाणी एखाद्याला जीवदान देऊ शकते, तसेच पाण्यात बुडाल्याने ते जीवावरही बेतू शकतं. योग्य कळजी न घेतल्यास हलगर्जीपणा अनेकांच्या जिवावर बेततो. त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी नेहमी योग्य खबरदारी घेतली गेली पाहिजे. काही ठिकाणी समुद्रकिनारी आणि पाण्याच्या ठिकाणी लाईफ गार्डही खबरदारी म्हणून तैनात करण्यात येतात. लाईफ गार्ड असल्यास असे प्रकार टाळण्यास मदत होते. पाण्याच्या ठिकाणी नेहमी सावध राहणे गरजेचे असते. याच ठिकाणी लाईफ गार्ड असता तर हा प्रकार टळला असता.