विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी आघाडीचे तीन बडे नेते राज्यपालांना भेटले, अर्धा तास चर्चा; राज्यपाल म्हणाले, उद्या सांगतो

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला.

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी आघाडीचे तीन बडे नेते राज्यपालांना भेटले, अर्धा तास चर्चा; राज्यपाल म्हणाले, उद्या सांगतो
governor bhagat singh koshyari
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 6:45 PM

मुंबई: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असं आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे राज्यपाल उद्या काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, 28 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज राजभवनावर आले होते. या तिन्ही नेत्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांना सरकारचा प्रस्तावही सादर केला. या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधून चर्चेची माहिती दिली.

अध्यक्षाविना विधानसभा कशी ठेवणार?

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला आहे. त्यांना मंजुरी द्यायची आहे. ती द्यावी म्हणून आम्ही त्यांना भेटलो. त्यांना विनंती केली आहे. उद्या कार्यक्रम जाहीर करण्यास मुभा द्यावी असं त्यांना सांगितलं. आम्ही जे काही बदल केले आहेत. त्याबद्दल त्यांनी फार विचारणा केली नाही. लोकसभेत जी पद्धत आहे तीच पद्धत विधानसभेसाठी घेतली आहे. विधान परिषदेची पद्धतही जवळपास तीच आहे. त्यामुळे आपण काही चुकीचं किंवा वेगळं केलं असं नाही. त्यांना काही माहिती घ्यायची आहे. ती घेतो आणि कळवतो असं त्यांनी सांगितलं आहे, असं थोरात यांनी सांगितलं. राज्यपालांना काही माहिती घ्यायची असेल तर घेतील आणि आम्हाला मान्यता देतील. बिगर अध्यक्षांची विधनासभा कशी ठेवता येईल. ते सीनियर नेते आहेत. त्यांना खूप अनुभव आहे, असंही ते म्हणाले. 12 निलंबित आमदारांबाबत काही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यपाल सकारात्मक

राज्यपालांनी जे पत्रं दिलं होतं सरकारला अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं. त्यानुषंगानेच आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्रं त्यांना दिलं. ही निवडणूक दोन दिवसात व्हावी. कायम अध्यक्ष विधानसभेला असणं आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही मागणी केली आहे. राज्यपालांची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत कायदेशीर चर्चा करून उद्या निर्णय कळवतो असं राज्यपालांनी सांगितलं. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. अशा घटना घडतात तेव्हा त्यांची भूमिका महत्त्वाची असते. ते सकारात्मक निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

आम्ही नियमानुसार नियमात बदल केले आहे. विधानसभेचे जे अधिकार आहेत, ते वापरूनच आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यपाल अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करतील असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

कोंबड्याना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांनी नितेश राणेंना फटकारले

प्रकाश आंबेडकर हे ‘रिपब्लिकन’ नाहीत, जोगेंद्र कवाडे यांचं रिपाइं ऐक्यावरही मोठं विधान

विधानसभेचा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांचेच दोनदा पत्रं, आता निर्णय घ्या, थोरातांची मागणी; राज्यपाल भेटी आधीच आघाडीचं दबाव तंत्र?

Follow Us