EXCLUSIVE : महाराष्ट्रात महासंग्राम, महाविकास आघाडीचे ‘हे’ पाच शिलेदार शिंदे गट-भाजपला टक्कर देण्यासाठी तयार

| Updated on: Jan 11, 2023 | 6:53 PM

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय.

EXCLUSIVE : महाराष्ट्रात महासंग्राम, महाविकास आघाडीचे हे पाच शिलेदार शिंदे गट-भाजपला टक्कर देण्यासाठी तयार
Follow us on

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (MLC Shikshan Padvidhar Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला उमेदवारी कुणाला द्यायची यावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) धुसफूस असल्याची माहिती समोर आली होती. नागपूरच्या (Nagpur) जागेसाठी काँग्रेस (Congress) आग्रही होती. तर शिवसेनेच्या ठाकरे गटालाही (Shiv Sena Thackeray Group) ही जागा हवी होती. अखेर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि सर्वानुमताने जागांचं वाटप केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desasi) यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेमके उमेदवार कोण असतील याबाबत माहिती समोर आलीय.

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय. तसेच नागपूरची जागा ठाकरे गट लढवणार अशी माहिती नाना पटोले यानी दिली. त्यामुळे आता नागपूरमधून ठाकरे गटाकडून गंगाधर नागाडे उमेदवार असतील.

हे सुद्धा वाचा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे उमेदवार असतील. नाशिक मतदारसंघासाठी काँग्रेसचे सुधीर तांबे उमेदवार असतील. महाविकास आघाडीने कोकणची जागा ही शेकापसाठी सोडली आहे. शेकापचे नेते बाळासाराम पाटील हे कोकण मतदारसंघासाठी निवडणूक लढतील.

अमरावतीच्या जागेवर काँग्रेसचे धीरज लिंगाडे हे उमेदवार असतील. खरंतर काँग्रेस नागपूर जागेसाठी देखील आग्रही होती. पण ठाकरे गटाला ती जागा हवी होती. अखेर महाविकास आघाडीने एकमताने ठाकरे गटासाठी नागपूरची जागा निश्चित केली.

जयंत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?

“अमरावती, नाशिक येथे काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. अमरावती आणि इतर मतदारसंघात अर्ज दाखल केले जातील. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या जागेसाठी एकमताने निर्णय झालाय. शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. इतर कुणी अर्ज भरलाय त्यांच्याशी चर्चा केली जाईल. या निवडणुकीला एकमताने जाण्याचे काम केलं जाईल. आमचं सर्वांचं एकमत झालंय”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

“नागपूरच्या जागेसाठी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी भूमिक मांडली होती. काँग्रेस त्याठिकाणी अर्ज भरणार नाही. त्या व्यतिरिक्त तिथे जे अर्ज भरणार आहेत त्यांचंही एकमत केलं जाईल”, असं जयंत पाटील म्हणाले.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाई, अनेक प्रश्न आहे. जागा वाटप हा प्रश्न महत्त्वाचा नाहीय. आम्ही एकमताने या सत्तेला थांबविण्यासाठी निर्णय घेतला आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

“हुकूमशाहीने एकमताने लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही लढाई आहे. त्यासाठी आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. पाचही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा प्रयत्न करु”, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झालीय. यामध्ये नाशिक, अमरावती या दोन पदवीधरच्या जागांसाठी आणि औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

भाजपकडून पाच जागांच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कोकण शिक्षक मतदारसंघासाठी, रणजीत पाटील यांची औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी तसेच किरण पाटील यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.