Maharashtra Lockdown : किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार! गर्दी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Apr 19, 2021 | 7:37 PM

किराणा दुकाने आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Lockdown : किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार! गर्दी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं 15 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या काळात राज्यभरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमधून काही घटकांना सूट देण्यात आलीय. पण किराणा दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे किराणा दुकाने आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Grocery stores will be open from 7 a.m. to 11 p.m)

ऑक्सिजन निर्मितीबाबत महत्वाचा निर्णय

कोरोनारुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करावीत. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सचिवांनी जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे, आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महत्वाच्या सूचना

राज्यातील रुग्णालयात उपलब्ध खाटांचा, ऑक्सिजन तसेच रेमिडिसिव्हीर औषध पुरवठ्याचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. येणाऱ्या काळात इतर राज्यात रुग्णवाढ झाल्यानंतर महाराष्ट्राला बाहेरुन मिळणारा ऑक्सिजन कमी पडण्याची भीती लक्षात घेऊन राज्यातंच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करावी. कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्रकल्प स्थापन झाले आहेत. मुंबई महापालिकेनेही अशा प्रकल्पनिर्मिती संदर्भात कार्यवाही सुरु केली आहे. या तिघांनी विहित प्रक्रियेद्वारे खरेदी केलेल्या दरांना प्रमाण मानून नवीन ऑक्सिजन प्रकल्पांसाठी खर्च करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामुळे निविदा प्रक्रियेतील विलंब टाळता येईल व प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजननिर्मिती वाढवण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु

राज्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमिडिसिव्हिर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

संबंधित बातम्या :

Pune Lockdown : ‘मरणं झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा, पालकमंत्री साहेब वाचवा’, पुणेकरांची अजितदादांना साद

नागपुरात अक्षरक्ष: मृत्यूचं तांडव, दिवसभरात तब्बल 113 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाचं प्रचंड थैमान

Grocery stores will be open from 7 a.m. to 11 p.m