
सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहर आणि कोकण किनारपट्टीला सध्या मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच येत्या २४ ते २७ जुलै २०२५ दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार असल्याने मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २४ जुलै २०२५ ते रविवार, २७ जुलै २०२५ या कालावधीत सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १.२० वाजता समुद्रात सर्वाधिक ४.६७ मीटर उंचीची लाट उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अशी सूचना महापालिकेने दिली आहे.
भरतीची वेळ काय?
भरतीच्या काळात नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे वाहतूक कोंडी, जलभराव आणि सार्वजनिक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ठिकाणी जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग सरासरी ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. जोरदार पावसादरम्यान तो ४५ किमी प्रतितासांपर्यंत वाढू शकतो. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि झाडांखाली, जलकाठावर किंवा उघड्या ठिकाणी उभे राहणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. आज या भागांमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामुळे डोंगराळ भाग, नदीकाठ आणि घाटमाथ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच पालघर जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. समुद्रालगत राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे आणि मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामीण भागात वीज किंवा झाडे पडल्याने दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळेच आज आणि उद्या कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळलेला असून, किनारी भागात ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १०३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आज ‘रेड अलर्ट’ असूनही काही किनारपट्टी भागातून पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्याचे चित्र आहे. मात्र, नागरिकांनी तरीही सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.