परप्रांतीय कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड; महाराष्ट्रातून बिहारला गेलेल्या ट्रेन्समध्ये 38 कोरोना पॉझिटिव्ह

| Updated on: Apr 14, 2021 | 9:11 AM

हाराष्ट्रातून आलेल्या 4 एक्स्प्रेस गाड्यांमध्ये कोरोनाचे एकूण 38 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. | Coronavirus Migrant labours

परप्रांतीय कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड; महाराष्ट्रातून बिहारला गेलेल्या ट्रेन्समध्ये 38 कोरोना पॉझिटिव्ह
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केल्यानंतर आता परप्रांतीय मजुरांची आपापल्या गावाकडे परतण्यासाठीची धडपड आणखीनच वाढली आहे. मात्र, यामुळे आता इतर राज्यांमध्ये कोरोना पसरण्याचा धोका वाढला आहे. कारण, नुकत्याच महाराष्ट्रातून बिहारमध्ये गेलेल्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. (Migrant workers in Mumbai were seen returning to their native places)

प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातून आलेल्या 4 एक्स्प्रेस गाड्यांमध्ये कोरोनाचे एकूण 38 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर बिहारमध्ये मंगळवारी कोरोनाचे 4157 नवे रुग्ण आढळून आले. इतर राज्यांमधून येणाऱ्या कामगारांमुळे नजीकच्या काळात हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

तर दुसरीकडे बुधवारी पुन्हा एकदा मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर (LTT) परप्रांतीय मजूर आणि कामगारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कन्फर्म तिकीट असेल तरच रेल्वे स्थानकात प्रवेश मिळेल अशा सूचना देऊनही मजूर टिळक टर्मिनसवर गर्दी करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत गावी जायचेच, अशा मानसिकतेने हे लोक इकडे येत आहेत. त्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहेत. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळही अपुरे पडत आहे.

‘परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये, सरकार तुमची काळजी घेईल’

लॉकडाऊनच्या भीतीने गावी परतत असलेल्या परप्रांतीय कामगारांना महाराष्ट्रातच थांबावे, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते.

नागपुरात पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती

एकीकडे लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूर गावी परतत असले तरी नागपुरातील काही कामगारांनी महाराष्ट्रातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जगण्यासाठी अन्नधान्य गोळा करण्यासाठी सध्या हे मजूर भटकंती करत आहेत. या मजुरांनी मंगळवारी प्रतापनगर भागात गर्दी केली होती. सध्या लॉकडाऊनच्या शक्यतेने मजुरांना फार काम मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या मजुरांना वणवण करावी लागत आहे.

(Migrant workers in Mumbai were seen returning to their native places)