महाड दुर्घटनेत बचावलेल्या 4 वर्षीय चिमुरड्यांचं पालकत्व एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असल्याचं प्रतिपादन

| Updated on: Aug 27, 2020 | 12:32 AM

महाड इमारत दुर्घटनेत आपलं संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांचं पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी स्वीकारलं आहे.

महाड दुर्घटनेत बचावलेल्या 4 वर्षीय चिमुरड्यांचं पालकत्व एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असल्याचं प्रतिपादन
Follow us on

मुंबई : महाड इमारत दुर्घटनेत आपलं संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांचं पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी स्वीकारलं आहे. मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन चिमुरड्यांची नावे आहेत. दरम्यान, या दोन्ही लहान मुलांचं पालकत्व स्वीकारण्यामागे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याचं प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग हा चिमुरडा इमारतीतून बाहेर पडण्यास यशस्वी ठरला. मात्र, त्याचं संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेचं बळी ठरलं. त्याचं आई-वडिलांचं छत्र हरपलं. दुसरीकडे मोहम्मद बांगी या चार वर्षांच्या चिमुकल्याची आई आणि भावंडांचा या दुर्घटनेत दुर्देवी अंत झाला. मोहम्मदलासुद्धा तब्बल 18 तासांच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आलं. मोहम्मद आणि अहमद दोघांचं आई-वडिलांचं छत्र नसल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारलं.

“दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी 10 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येईल”, असं एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी घोषित केलं.

“80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

नेमकी घटना काय?

महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या : 

महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा