“छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले

आता विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा..., राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले
| Updated on: Nov 15, 2024 | 1:13 PM

Raj Thackeray On Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील विधानसभेची आगामी निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात मतदारांना विविध आश्वासने दिली जात आहेत. नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यात मनसेने महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर भर दिला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा विद्यामंदीर बांधा आणि गडकिल्ले सुधारा, अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावले.

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. महाविकासआघाडीचे सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो. त्याच मोठ्या आवाजात आम्ही जय शिवराय म्हणणार. जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. दुसरा कोणता राजा पृथ्वीवर असा झाला नाही. आज 400 वर्षांनंतर जय भवानी म्हटले तरी मुर्दाही उठून जय शिवाजी म्हणले असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याच मुद्द्यांवर टीका केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभं करणार असे सांगत आहेत. मला वाटतं त्यापेक्षा विद्या मंदिरं उभं करणं गरजेचं आहे. गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. मला वाटतं काही गल्लत होतं. चौका चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

“तुमच्या मताची किंमत काय राहिली?”

“यावेळची निवडणूक तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत. ना कोणी परमेश्वर सांगू शकत. पण राज्याच्या राजकारणात अशी निवडणूक आजपर्यंत झाली नाही. तुम्ही समजा लोकसभा पाहिली असेल तर एक खासदार एका मताने निवडून आला होता. असं आपण कधी पाहिलं नव्हतं. नंतर रिकाऊंटिंगमध्ये ३९ मतांनी विजयी झाला. असं कधी झालं नव्हतं. मला वाटतं लोकांनी विसरू नये. तुम्ही उन्हातान्हात मतदान केलं. ते मत सध्या कुठे आहे, ते बघा. जो पक्ष तुम्हाला आवडत नाही त्यांना तुम्ही मतदान करत नाही. पण तुमच्या मतावर निवडून आलेला दुसऱ्या पक्षात गेला तर तुमच्या मताची किंमत काय राहिली. त्यामुळे तुम्ही २० तारखेला त्याचा विचार करा”, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us