मुंबईतील मोडक-सागर ठरला भरुन वाहणारा पहिला तलाव; मुंबईला दररोज केला जातो 385 कोटी लीटर पाण्याचा पुरवठा

| Updated on: Jul 13, 2022 | 6:48 PM

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मुंबईतील मोडक-सागर ठरला भरुन वाहणारा पहिला तलाव; मुंबईला दररोज केला जातो 385 कोटी लीटर पाण्याचा पुरवठा
Follow us on

मुंबईः बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal) क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव (Modak-Sagar Lake) हा आज दुपारी 1.4 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी (Seven Lake) मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला असल्याची माहिती माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 

मध्यरात्री ओसंडून वाहू लागला

मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये 22 जुलै रोजी मध्यरात्री 3.24 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी 2020 मध्ये 18 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता, 2019 मध्ये 26 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन 2018 व 2017 अशा दोन्ही वर्षी हा तलाव 15 जुलै रोजी आणि 2016 मध्ये 1 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.

सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार 81152.20 कोटी लीटर (8,11,522 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 56.7 टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 43.72 टक्के अर्थात 9926.80 कोटी लीटर (99,268 दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 66.79 टक्के अर्थात 9689.40 कोटी लीटर (96,894 दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या 53.90 टक्के अर्थात 10432.20 कोटी लीटर (1,04,322 दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 51.6 टक्के अर्थात 36611.30 कोटी लीटर (3,66,113 दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 53.18 टक्के अर्थात 1473 कोटी लीटर (14730 दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या 76.8 टक्के अर्थात 612.10 कोटी लीटर (6,121 दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

या सर्व आधीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव यापूर्वीच्या नोंदींच्या तुलनेत काही दिवस आधीच पूर्ण भरुन वाहू लागला आहे.