दीड वर्षांपूर्वी लग्न झाले, मूल होत नव्हते, मग तिने असे काही की…

Mumbai Crime | कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयातून २० दिवसांचे बाळ चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला आहे. महिलेने बाळाची चोरी का केली? हे कारण सांगितल्यावर पोलिसांनाही धक्का बसला आहे. आता बाळाला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

दीड वर्षांपूर्वी लग्न झाले, मूल होत नव्हते, मग तिने असे काही की...
crime news
Image Credit source: TV9MARATHI
Jitendra Zavar | Updated on: Jan 12, 2024 | 10:19 AM

गोविंद ठाकूर, मुंबई, दि. 11 जानेवारी 2024 | मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शताब्दी रुग्णालयात मुलाची चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. लग्न होऊन दीड वर्ष झाले. त्यानंतर मूल होत नव्हते. त्यामुळे त्या महिलेने रुग्णालयातून मूल चोरी केल्याचा प्रकार उघड झाले आहे. या प्रकरणी कंदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबईतील कांदिवली पोलिसांनी मूल चोरणाऱ्या महिलेला अटक केली आहे. त्या महिलेने कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयातून २० दिवसांचे बाळ चोरून नेले होते. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर बाळाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

कशी घडली घटना

घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मुलाची चोरी करणारी महिला प्रथम शताब्दी रुग्णालयात गेली. रुग्णालयात जाऊन नवजात बालकांच्या विभागात गेली. त्या ठिकाणी एका २० दिवसांच्या मुलाच्या आईशी तिने संवाद साधला. त्या मातेला तिने आधी विश्वासात घेतले. त्यानंतर आरोपी महिलेने मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी पाठवले. मी बाळाजवळ थांबते, तुम्ही चिंता करु नका, असे सांगत बाथरुममध्ये पाठवले.

संधी साधली अन् मुलास घेऊन पसार

महिला मुलाच्या चोरीसाठी संधीच्या शोधात होती. मुलाची आई बाथरुमध्ये गेली आहे आणि मुलाजवळ कोणीच नाही, हे पाहून कोणाला संशय येणार नाही, या पद्धतीने मुलाला घेऊन ती पसार झाली. तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रथम मुलाला घेऊन ती मालवणी परिसरात गेली होती.

कशासाठी केली चोरी

पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने सांगितले की, दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र मूल होत नव्हते. त्यामुळे मुलाची चोरी करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात, त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Follow Us