
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आता हाच वाद मिटवण्यासाठी ठाकरे गटाकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाकडून मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाने मनसेला याबद्दलचा प्रस्ताव दिल्याचे बोललं जात आहे. सध्या यावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरुन ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे. आता हीच नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाने एक मोठी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाने मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या नव्या प्रस्तावावर आणि दोन्ही पक्षांतील समन्वयावर सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा करण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदावरून निर्माण झालेला पेच सुटणार की नाही, या प्रस्तावाला मनसेकडून होकार मिळणार की नाही, याबद्दलची माहिती समोर येणार आहे.
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील 3 स्वीकृत नगरसेवकांची नावे प्रशासनाकडे सादर केली आहेत. मात्र, यामध्ये मनसेला स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे मनसेकडून वारंवार युती धर्म पाळला गेला नसल्याची टीका ठाकरे गटांवर केली जात आहे. कोत्या मनोवृत्तीची माणसं असा घणाघातही मनसेने केला आहे. याबद्दल मनसेने वारंवार आपली नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या ऑफरने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या वादावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेचे राजकारण वेगळे असते. मी वैयक्तिकरित्या या प्रक्रियेत पडत नाही, पण आमची युती आजही टिकून आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेईल, असे सांगत त्यांनी वादावर थेट भाष्य करणे टाळले आहे. दरम्यान आता याप्रकरणी मनसे काय निर्णय घेणार, ठाकरेंच्या प्रस्तावावर होकार कळवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.