
मुंबई | 27 सप्टेंबर 2023 अक्षय कुडकेलवार : मंत्रालय… मुंबईतील अशी जागा जिथं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. आपल्या समस्या, आपले प्रश्न अन् आपली कामं घेऊन येतात. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं ठिकाण असणाऱ्या या मंत्रालयात जाण्यासाठी आता नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार जर तुम्हाला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर पास लागेल. या पासशिवाय तुम्ही प्रवेश करू शकणार नाही. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यासही परवानगी नसेल. गृहविभागाने मंत्रालयात जाण्यासाठी आखून देण्यात आलेल्या नियमावलीतील महत्वाच्या 10 बाबींवर एक नजर टाकूयात…
मंत्रालयात वारंवार वेगवेगळी आंदोलनं केली जातात. आत्महत्येचे प्रयत्नही केले जातात. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृहविभागाकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेशपास बंधनकारक असेल.
मंत्रालय प्रवेश पास तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असेल.मंत्रालयात जायचं असल्यास आपल्याला कोणत्या विभात जायचं आहे. याची माहिती द्यावी लागेल. त्या प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्यापूर्व परवानगीनेच मंत्रालयात प्रवेश करता येईल. मंत्रालयात गेल्यानंतर ही जबाबदारी मंत्रालय सुरक्षा कक्षाची असेल. पूर्वपरवानगी शिवाय कुणालाही मंत्रालयात प्रवेश करता येणार नाही.