शिथिलता येताच मुंबईकर सुटले, ‘बेस्ट’साठी गर्दी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

| Updated on: Jun 08, 2020 | 11:39 AM

(Mumbai Traffic Jam on First Day of Unlock)

शिथिलता येताच मुंबईकर सुटले, बेस्टसाठी गर्दी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
Traffic (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आजपासून काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात अधिक शिथिलता येताच मुंबईकर अक्षरशः सुटले आहेत. अनेक ठिकाणी ‘बेस्ट’ बससाठी गर्दी पाहायला मिळाली, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. मरिन ड्राईव्ह आणि चौपाट्यांवर गर्दीची उदाहरणं ताजी असताना ट्राफिक जामचेही ‘पुनश्च हरि ओम’ झाले. (Mumbai Traffic Jam on First Day of Unlock)

खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्याला तिसऱ्या टप्प्यात परवानगी मिळाली आहे. मुंबई अनलॉक होताच पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर उतरली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. कांदिवली-गोरेगाव भागात पुन्हा पूर्वीप्रमाणे सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. अनेक गाड्या एकाच जागेवर बराच वेळ खोळंबून राहिल्या.

ठाण्यातही तीच तऱ्हा

ठाण्यातील आनंदनगर मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. लोकल सेवा बंद असल्याने चाकरमानी कामावर जाण्यासाठी बेस्ट किंवा स्वतःची चारचाकी आणि दुचाकींचा वापर करत आहे. त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात गाड्या टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या आहेत. ई पास सेवा बंद केल्यामुळे जड अवजड वाहनेही रस्त्यावर येत आहेत.

पाहा व्हिडीओ :

डोंबिवलीत लोकल बंद आणि अतिशय अपुऱ्या बस सेवेमुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. आजपासून अनेक सरकारी व खासगी कार्यालयात जाण्यासाठी दिवा शहरातील नागरिकांची बसमधून प्रवास करण्यासाठी रीघ लागली. इंदिरा चौकापासून फडके रोडपर्यंत ही रांग दिसली.

भाईंदरमध्ये बेस्ट बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी आणि पाच जणांना उभ्याने प्रवास करुन नेले जात आहे. मात्र रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

अनेकांसाठी प्रवास ही हौस नसून नाईलाज आहे, मात्र शहरात प्रवासासाठी बंधन उरले नसल्याचा गैरफायदा घेत हिंडणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी किती आणि फिरण्याची हौस भागवणारे किती, हा प्रश्न पडतो.

वाचा सविस्तर : मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?

काय सुरु?

1. दहा टक्के किंवा दहा (जे अधिक असेल ते) कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडी राहतील. एमएमआरए (मुंबई महानगर) क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका हद्दीत सरकारी कार्यालये 15% मनुष्यबळांसह उघडतील. कर्मचारी आणि कंपनी या दोहोंना ‘कोरोना’शी संबंधित सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल

नियम इथे वाचा : खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स

2. जिल्ह्यांतर्गत बस आणि एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. बस क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करु शकतील. म्हणजेच एका सीटवर एकाच प्रवाशाला मुभा असेल.

काय बंद?

1. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, मोठी सभागृहे उघडण्यास संमती नाही.

2. केश कर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहणार आहेत.

3. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास अद्याप उघडणार नाहीत.

4. केंद्राने मान्यता दिली असली तरी राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही.

5. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

6. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम

(Mumbai Traffic Jam on First Day of Unlock)