पुढच्या दोन दिवसात खान्देशात गारपीट, तर उत्तर कोकणात हलक्या सरींची शक्यता

| Updated on: Dec 12, 2020 | 12:42 AM

पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. (possibility of hailstorm in north maharashtra district)

पुढच्या दोन दिवसात खान्देशात गारपीट, तर उत्तर कोकणात हलक्या सरींची शक्यता
महाराष्ट्रात पावसाचा इशारा
Follow us on

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसात खान्देशातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर कोकणात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे (possibility of hailstorm in north maharashtra district).

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत ढगाळ वातावरण

मुंबईसह ठाणे आणि कोकणातील काही भागांध्ये शुक्रवारी सकाळी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह खान्देशात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसात निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

रायगड जिल्ह्यात शुक्रवारी महाड, पोलादपुर, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाड, मुरुड, पेण, तळा, सुधागड, कर्जत, खालापुर, पनवेल, उरण सर्वच तालुक्यात पहाटेपासून पाऊस पडला. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे विटभट्टी व्यवसाईकांचंही नुकसान झालं आहे.

पुण्यातही पावसाची हजेरी

पुण्यातही अनेक भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांनी पावसाचा अंदाज घेत बाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दुपारी इशारा दिल्याप्रमाणे डहाणूमध्ये गुरुवाती रात्री तर जिल्ह्यात अन्यत्र सकाळी आठ वाजल्यापासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने शेतकऱ्यांबरोबरच मच्छिमार, वीटभट्टी उत्पादक आणि गवत, पावळी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा, वसई सर्वच तालुक्यात पाऊस सुरू झाला असल्याने मासे सुकवण्यासाठी टाकलेल्या मच्छिमाराचे मोठे नुकसान झालं आहे.

पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे (possibility of hailstorm in north maharashtra district ).

संबंधित बातमी : मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज