रेनकोट, छत्र्या बाहेर काढायच्या का?, जून सुरू झाला; पावसाबाबतचा हवामान खात्याचा अंदाज काय?

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. मात्र, आता राज्यातील जनतेची लवकरच या उकाड्यातून सुटका होणार आहे. हवामान खात्याने तशी गोड न्यूज दिली आहे.

रेनकोट, छत्र्या बाहेर काढायच्या का?, जून सुरू झाला; पावसाबाबतचा हवामान खात्याचा अंदाज काय?
rain
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2023 | 9:40 AM

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील जनतेला प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. इतके प्रचंड ऊन आहे की घराच्याबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यामुळे सर्वांनाच पावसाचे वेध लागले आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊसही होत आहे. त्यामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण होतो. पण नंतर जी भयंकर उष्णता वाढते त्यामुळे जीवाची काहिली होत आहे. मात्र, आता यातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने पावसाबाबतची मोठी अपडेट दिली आहे.

मोसमी पाऊस येत्या दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांवर गेल्या 11 दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या मोसमी पावसाने वेगासह अंदमान बेटांना व्यापून मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात प्रवेश केला आहे. हवामान अनुकूल असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे अरबी समुद्रात दाखल होतील आणि 4 जूनच्या आसपास केरळमध्ये धडकतील, असा अंदाज आहे.

छत्र्या, रेनकोट काढा

मात्र तरीही महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन होण्यास किमान 10 दिवस प्रतीक्षा करावी लागेल असे सध्याचे चित्र आहे. देशाच्या काही भागात मोसमी पाऊसाला विलंब होऊन कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून येत्या 2 ते 3‌ दिवसात मालदीव बेटे, कमोरीयन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. पाऊस थोडा लांबणार असला तरी याच महिन्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांना छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढावे लागणार आहेत.

कोकणातही सक्रिय होणार

कोकणात पुढील दोन दिवसात मान्सून पूर्व पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोकणात 8 ते 10 जूनपर्यंत मान्सून सक्रीय होण्यार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय. राज्यात 16 जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, अशी माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होण्याची चाहूल लागलीय, कारण आकाशात काळ्या ढगांची दाटीवाटी सुरु झाली आहे. मान्सून सक्रीय होण्याचे संकेत कोकणात मिळू लागले आहेत. काळ्या ढगांच्या दाटीवाटीत सध्या कोकणाचं निसर्गाचे रुप सुद्धा बहरून निघालंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us