Raj Thackeray Loudspeaker : मी त्या मौलवींचे आभार व्यक्त करतो, अजानचा भोंगा वाजला नाही; राज ठाकरे खूश

| Updated on: May 04, 2022 | 2:28 PM

ज्यांना हा विषय समजला, त्या सर्वांचे आभार, असे राज ठाकरे म्हणाले. श्रेय घेण्याचा हा विषय नाही, असेही ते म्हणाले. मंदिरावरचे भोंगेही (Loudspeaker) काढले गेले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर अजान लाउडस्पीकरवर झाली तर हनुमान चालिसाही चालणार, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

Raj Thackeray Loudspeaker : मी त्या मौलवींचे आभार व्यक्त करतो, अजानचा भोंगा वाजला नाही; राज ठाकरे खूश
मशिदींवरच्या भोंग्यांवर मत मांडताना राज ठाकरे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : कायद्याचे पालन करणाऱ्यांना तुम्ही ताब्यात घेणार आणि जे कायद्याचे उल्लंघन करत आहेत, त्यांना मोकळीक देणार, हे लक्षात आले नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. 90 टक्के मशिदींवर भोंगे वाजलेच नाहीत. त्यामुळे या मशिदींमधील मौलवींचे आभारही राज ठाकरे यांनी मानले. आजच्या अल्टिमेटमवर आपली भूमिका त्यांनी मांडली. ते मुंबईत बोलत होते. ते म्हणाले, की विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी सांगितले होते, की सर्व मशिदींना सूचना दिल्या आहेत. मग 135 मशिदींवर अजान झाली, त्यावर काय उत्तर आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी नांगरे पाटील यांना केला. ज्यांना हा विषय समजला, त्या सर्वांचे आभार, असे राज ठाकरे म्हणाले. श्रेय घेण्याचा हा विषय नाही, असेही ते म्हणाले. मंदिरावरचे भोंगेही (Loudspeaker) काढले गेले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर अजान लाउडस्पीकरवर झाली तर हनुमान चालिसाही चालणार, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

‘135 मशिदींवर काय कारवाई करणार?’

90, 92 ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयार होते. त्यामुळे मशिदीतील मौलवींचे आभार मानतो. आमचा विषय त्यांना नीट समजला. पण मला आता मुंबईचा जो रिपोर्ट आला. त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींवर पाच वाजण्याच्या आत अजान लागली गेली. नांगरे पाटील यांचा फोन आला, ते म्हणाले, आम्ही सर्वांशी बोललो. ते अजान लावणार नाहीत. मग 135 मशिदींवर कशी लागली? त्यावर कारवाई करणार की नाही केवळ आमच्याच कार्यकर्त्यांची धरपकड करणार, असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.

‘पुन्हा सांगतो हा धार्मिक नाही, सामाजिक विषय’

राज ठाकरे म्हणाले, की कालपण सांगितले परत सांगतो, हा सामाजिक विषय आहे. धार्मिक नाही. त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ. माणुसकीपेक्षा धर्म मोठा असेल तर आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. अजान लाऊडस्पीकरवर लागली तर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लागेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही आमच्या धर्माला घट्ट राहावे लागेल. तुमच्या सणासुदीला लाऊडस्पीकर लागतो तर समजू शकतो. पण 365 दिवस तुम्ही लावत असाल तर आम्हाला नाही ऐकायचे ते, अशी भूमिका त्यांनी मांडली.