त्यांचे अंदाज नेहमीच चुकत आले, आताही चुकतील; राऊतांचा भाजपला टोला

| Updated on: Jun 08, 2021 | 4:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपला टोला लगावला आहे.

त्यांचे अंदाज नेहमीच चुकत आले, आताही चुकतील; राऊतांचा भाजपला टोला
sanjay raut
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपला टोला लगावला आहे. भाजपचे अंदाज नेहमीच चुकत आले, आताही चुकतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (sanjay raut slams maharashtra bjp over modi-thackeray visit)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फार फार तर 10-15 मिनिटे चर्चा होईल, असं भाजपचे राज्यातील नेते सांगत होते. मात्र, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी 90 मिनिटे चर्चा केली. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांचे महाराष्ट्राबाबतचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. आताही चुकतील, असा टोला राऊतांनी लगावला.

चर्चा तर होणारच

ठाकरे-मोदी जेव्हा भेटतात तेव्हा चर्चा होणारच. चर्चा होत असेल तर निश्चित ती भेट महत्त्वाची आहे, असं सांगतानाच एक तास शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची वन टू वन चर्चा झाली. दोन्ही चर्चा महत्त्वाच्या आहेत. राजकीय संदर्भ कुणाला काढायचा तो काढू द्यात, असं सूचक विधान त्यांनी केलं.

सरकार पाच वर्षे टिकेल

मोदी-ठाकरे यांच्यात गोपनीय चर्चा सुरू होती. तेव्हा महाराष्ट्राचे दोन शिलेदार बाहेर उभे होते. त्यामुळे चिंतेची गरज नाही, असं सांगतानाच चिंता करू नका. ठाकरे सरकार पाच वर्षे टिकेल, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

मोदींबद्दल नेहमीच आदर

मोदींबद्दल आम्हाला आदर आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नेहमीच आम्हाला आदर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाळासाहेब आणि मोदींचं असलेलं नातं आमच्यापर्यंत झिरपत नाही का?, वाजपेयी आणि बाळासाहेबांची मैत्री होती. दोघांमध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे मोदी-ठाकरे, ठाकरे-फडणवीस यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध असू नये का?, असा सवाल त्यांनी केला.

कुणाच्याही मध्यस्थीशिवाय मोदींनी लक्ष घातलं

मोदी-ठाकरे संवाद वाढतोय ही चांगली गोष्ट आहे. हा संवाद असाच चांगला व्हावा. संघर्ष कायम नसतो. संघर्षाला पूर्णविराम द्यावा लागतो. मोदींनी एक तास दिला. तुम्ही संघर्षाची भाषा कशाला करता? केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले होणं हे घटनात्मकदृष्ट्या चांगलं आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नात पंतप्रधानांनी कुणाच्याही मध्यस्थीशिवाय लक्ष घातलं. केंद्राशी संबंध राखणं ही कुणाची मक्तेदारी नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

पंतप्रधानांचा दृष्टीकोण सकारात्मक

मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ सोडवावा ही महत्त्वाची मागणी आहे. तो केंद्राचा विषय आहे. त्यामुळे ही मागणी केंद्रासमोर मांडण्यात आली आहे. तसेच पीक विमा असेल, पदोन्नतीतील आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं असेल किंवा मेट्रोचा विषय असेल अशा अनेक विषयांवर मोदी आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांचा दृष्टीकोण अत्यंत सकारात्मक होता असं मला सांगण्यात आलं, असं ते म्हणाले. (sanjay raut slams maharashtra bjp over modi-thackeray visit)

 

संबंधित बातम्या:

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल: फडणवीस

‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी’, खासदार उदयनराजेंचा आरोप

हरभजन सिंग यांची मुलगी, रवी राणांची बायको, नवनीत राणांच्या सर्टिफिकेटवर जात कोणती?

(sanjay raut slams maharashtra bjp over modi-thackeray visit)