मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी नवा बॉम्ब फोडला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांसह (kirit somaiya) भाजपच्या 28 नेत्यांची प्रकरणं उघड करणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या रडारवरील ते 28 नेते कोण? असा सवाल केला जात आहे. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या मोतीलाल ओसवाल (motilal oswal) कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यात लाखो रुपये आले होते. त्यामुळे सोमय्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजप भ्रष्टाचाराविरोधी लढ्यात कसं काम करतंय हे दिसून येतंय. त्यांच्याच हातात सूत्रं आहेत आणि हे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार? ज्यांच्या तोंडाला शेणाचा वास ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेत आहेत. आता यांचा खेळ संपला आहे. रोज ही प्रकरणं बाहेर येतील. सुरुवात या लोकांनी केली होती आता शेवट आम्ही करतोय. फक्त सोमय्यांचं एकट्याचं प्रकरण नाही. भाजपच्या 28 लोकांचं प्रकरण आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट सोमय्यांवर आरोप केला. एनसीएलमध्ये 5600 कोटीचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी मोतीलाल ओसवाल या कंपनीचं नाव आलं होतं. या कंपनीची चौकशी व्हावी म्हणून सोमय्यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्या युवक प्रतिष्ठानला त्यानंतर मोतीलाल ओसवालकडून लाखोंच्या देणगी दिल्या गेल्या. सध्या मला त्याबाबतचे दोन चेक मला मिळाले आहेत. तुम्ही भ्रष्टाचाराच्या कोणत्या लढाया लढत आहात? या घोटाळ्याशी तुमचा संबंध आहे असं आम्ही म्हटलं तर तुमचं काय उत्तर आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कार्यालय होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत सरकार उत्तर देईल. मी बोलणं योग्य नाही. नवी मुंबईत अनेक राज्यांची भवनं आहेत. आपल्या देशात आपण कोणत्याही राज्यात जाऊ शकतो. आम्हीही अयोध्येत एक सेंटर करणार आहोत. लखनऊ आणि वाराणासीतही करू. योगींचं कार्यालय हा विषय सरकार टू सरकार आहे. त्याबाबत राज्य सरकार पाहिल, असं त्यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं आहे. त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांकडे खूप पत्रं येत असतात. मला त्या पत्राविषयी माहीत नाही, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारला सल्ला द्यावा, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मोदीही पवारांचा सल्ला घेतात. पवार हे त्यांचे गुरु आहेत. आपण पवारांचा सल्ला घेतो. त्यानुसार काम करतो, हे स्वत: मोदींनीच सांगितलं आहे. हे फडणवीसांना माहीत नाही. अनेक लोक पवारांचे सल्ले घेतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे सल्ला घेतात, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.