स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार; राज्यपाल रमेश बैस यांचं मोठं विधान

| Updated on: May 22, 2023 | 8:05 AM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे, असं विधान राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. तसेच सावरकर यांच्या जन्मजस्थळी नाशिकच्या भगूर येथे त्यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार; राज्यपाल रमेश बैस यांचं मोठं विधान
vinayak damodar savarkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला हवं. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचं भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. ने मजसी ने मातृभूमीला आणि जयस्तुते जयस्तुते या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे, असं विधान राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. येत्या 28 मे रोजी सावकरांची 140 वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे, अशी माहितीही राज्यपाल बैस यांनी दिली.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण पार पडले. या वर्षीचा शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ राणे, विज्ञान पुरस्कार अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार व स्मृतिचिन्ह पुरस्कार अभिवक्ता प्रदीप परुळेकर यांना देण्यात आला. हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी हे विधान केलं.

हे सुद्धा वाचा

यावेळी त्यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. सावरकर एक उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं वर्णन आपल्या पुस्तकातून अधोरेखित केलं आहे. मधल्या काळात अनेक क्रांतीकारकांबद्दल एक नॅरेटिव्ह तयार केला गेला. या क्रांतिकारकांना बदनाम केलं गेलं. सावरकारांना नाकारणं म्हणजे सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि जवानांचं बलिदान नाकारणं आहे, असं रमेश बैस म्हणाले.

महान नायक

वीर सावरकर स्वातंत्र्य चळवळीतील महान नायक होते. ते विद्वान आणि दार्शनिक होते. दोनदा आजीवन कारवासाची शिक्षा मिळालेले ते एकमेव स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे विचार कालजयी होते. सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग आहे. ते सामाजिक विकृतीच्या विरोधात लढणारे योद्धा होते. ते थोर समाज सुधारक होते. ते जातीवादाच्या विरोधात आहे. जाती या देशासाठी कलंक असल्याचं ते सांगायचे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सावरकरांचे स्वप्न साकारण्यात येणार आहे. राजभवनात वीर सावकरांवर गॅलरी तयार करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

व्यक्ती नाही, विचार

सावरकर यांचे कार्य महान आहे. त्यांचे विचार उत्तुंग होते. सावरकर फक्त व्यक्ती नाही तर विचार आहेत. आपण सावरकरांचे अनेक प्रकारे वर्णन करू शकतो. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान प्रचंड मोठे आहे. काही वेळा त्यांच्या विषयी विरोधात लिहिले गेले आहे. पण ते सगळं विसरून या ठिकाणी त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत. त्यासाठी सावरकर यांच्या विचारांचा प्रचार केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.