‘कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपणार नाही, शिवसेना समोरच्याला संपवेल’, उदय सामंतांचं भाजपला उत्तर

| Updated on: Feb 09, 2021 | 8:23 PM

सिंधुदुर्गातील वैभववाडी नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे (Uday Samant reaction after Vaibhavwadi Corporaters enter ShivSena)

कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपणार नाही, शिवसेना समोरच्याला संपवेल, उदय सामंतांचं भाजपला उत्तर
Follow us on

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर शिवसेनेने भाजपला मोठा झटका दिला आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकिय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्षांतराचा कार्यक्रम पार पडला. पक्षांतरानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली (Uday Samant reaction after Vaibhavwadi Corporaters enter ShivSena).

“सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्याच उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोण काय बोलण्यापेक्षा सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी भाजपला दिलेलं हे उत्तर आहे”, असं उदय सामंत म्हणाले (Uday Samant reaction after Vaibhavwadi Corporaters enter ShivSena).

“भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे घुसणे, मारणे याच्या पलिकडे संवादच होऊ शकत नाही. वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीला चित्र स्पष्ट होईल. वैभववाडीमध्ये जे पक्षांतर झालंय ते विकासासाठी झालं आहे. तिथे विकास होऊ शकला नाही. त्यासाठी या सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला स्वीकारलं आहे. त्यांची फार मोठी विकासाची मागणी होती. त्या संपूर्ण परिसराला 14 कोटी रुपयांची नळपाणी योजना आवश्यक आहे. ती योजना देण्याचं उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

“विकासाच्या दृष्टीने नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याची जी काही पोचपावती द्यायची आहे ती नगरपालिका निवडणुकीत ते देतील. वैभववाडीची नगरपंचायत शिवेसेनेच्या ताब्यात येईल”, असा दावा सामंत यांनी केला.

“प्रत्येक ट्विटवर प्रतिक्रिया द्यावी, असं मला वाटत नाही. देशाचे गृहमंत्री आल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसैनिकाला दिलेली ही भेट आहे. कुणीही कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपू शकत नाही. शिवसेना समोरच्याला संपवू शकते. हे सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी करुन दाखवलं आहे”, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“भाजप हा देशातील मोठा पक्ष आहे. हा एका कुणाचा पक्ष नाही. तो संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असं त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केलं होतं. पण निवडणुकीनंतरच कोण जिंकेल ते दिसेल”, असं उदय सामंत म्हणाले.

“आज पक्षप्रवेश झालेला आहे. नगरपालिकेत 14 कोटींचं काम शिवसेना करुन दाखवेल. ते काम झाल्यानंतर वैभववाडीची नगरपंचायत शंभर टक्के शिवसेनेच्या ताब्यात येईल”, असा दावा त्यांनी केला.

“हा फक्त नगरपंचायतपुरता मर्यादित पक्ष प्रवेश आहे. पण अनेक जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य आमच्या संपर्कात आहेत. जर जिल्हा परिषदेच्या सभापती पदाचे राजीनामे घेतले गेले तर तिथेही सत्ता परिवर्तन होऊ शकते. निवडणुकीनंतर सिंधुदुर्गात जो झेंडा आहे तो बाजूला होऊन शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश’, शिवसेनेची खोचक टीका