मुंबईतील तीन जैन मंदिरांत पूजा करण्यास मुभा, याचिकाकर्त्या ट्रस्टला सुप्रीम कोर्टाकडून दोन दिवस परवानगी

| Updated on: Aug 21, 2020 | 4:20 PM

श्री पार्श्वतिलक श्वेताम्बर मुर्तिपूजक तपागच्छ जैन ट्रस्टने पर्युषण काळात जैन मंदिरात पूजा करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती

मुंबईतील तीन जैन मंदिरांत पूजा करण्यास मुभा, याचिकाकर्त्या ट्रस्टला सुप्रीम कोर्टाकडून दोन दिवस परवानगी
Follow us on

नवी दिल्ली : पर्युषण काळात जैन मंदिरात पूजा करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्या ट्रस्टला दिली आहे. फक्त याचिकाकर्ता ट्रस्टच मुंबईतील तीन जैन मंदिरांत केवळ दोन दिवसांसाठी पूजा करु शकेल. राज्य सरकार आर्थिक गुंतवणूक असलेल्या प्रत्येक कामांना परवानगी देत ​​आहे, पण मंदिरांचा प्रश्न येताच कोविडचा धोका असल्याचे सांगितले जाते, अशा शब्दात सरन्यायाधीश जस्टिस शरद बोबडे यांनी नाराजी व्यक्त केली. (Supreme Court grants permission to the petitioner-trust for pujas in Jain temples for two days of Paryushan period)

श्री पार्श्वतिलक श्वेताम्बर मुर्तिपूजक तपागच्छ जैन ट्रस्टने (SHRI PARSHWATILAK SHWETAMBER MURTIPUJAK TAPAGACCH JAIN TRUST) पर्युषण काळात जैन मंदिरात पूजा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना केवळ 22 आणि 23 ऑगस्ट हे दोनच दिवस दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिरात पूजा करण्याची मुभा दिली.

“आम्ही पर्युषण काळात उर्वरित दिवस दादर, भायखळा आणि चेंबूरच्या मंदिरात याचिकाकर्त्यांना प्रार्थना करण्यास परवानगी देतो” असे आदेश कोर्टाने दिले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि कोव्हिड संदर्भातील इतर नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार “पर्युषण” कालावधीचे दोन दिवस जैन मंदिरांत पूजा-अर्चा करण्यासाठी याचिकाकर्त्या-ट्रस्टला परवानगी देण्यात आली आहे. अन्य कोणत्याही ट्रस्ट किंवा कार्यक्रमास हा आदेश लागू नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

राज्य सरकारने मॉल आणि इतर आर्थिक उपक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे, मात्र मंदिरे उघडण्यास संमती दिलेली नाही, या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यावरील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले.

सरन्यायाधीश जस्टिस शरद बोबडे यांच्या खंडपीठाने मुंबईत तीन जैन मंदिरे सुरु करण्याच्या खटल्यावरील सुनावणीदरम्यान म्हटले की, राज्य सरकार आर्थिक गुंतवणूक असलेल्या प्रत्येक कामांना परवानगी देत ​​आहे, पण जेव्हा मंदिरांची बाब येते तेव्हा असे म्हटले जाते की मंदिरांमध्ये कोविडचा धोका आहे.