खारघर घटनेवरून सुषमा अंधारे यांचे राज ठाकरे यांना पत्र, राज ठाकरे पत्राला उत्तर देणार?

| Updated on: Apr 21, 2023 | 10:43 PM

राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलवली जातात का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. पण, झालेली घटना हा अपघात आहे. अपघाताचं राजकारण करायचं नसतं, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

खारघर घटनेवरून सुषमा अंधारे यांचे राज ठाकरे यांना पत्र, राज ठाकरे पत्राला उत्तर देणार?
Follow us on

मुंबई : खारघरवरून राजकारण न करण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. झालेली घटना दुर्दैवी आहे. झालेल्या घटनेला कुणाला जबाबदार धरणं योग्य नाही, असंही ते १७ एप्रिल रोजी म्हणाले. खरं तर सकाळच्या वेळी कार्यक्रम करायला नको होता, असंही त्यांनी म्हंटलं. तर कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारच्या हलगर्जीपणा झाला आहे. तिथंही मनुष्यवधाचा खटला आजही भरता येऊ शकतो, असं २० एप्रिल रोजी राज ठाकरे यांनी म्हंटलं.

राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलवली जातात का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. पण, झालेली घटना हा अपघात आहे. अपघाताचं राजकारण करायचं नसतं, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

खारघरमधील घटना मानवनिर्मित

यावरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहीलं. त्या पत्रात सुषमा अंधारे म्हणतात, आपण अत्यंत सिलेक्टिव्ह पद्धतीने व्यक्त झाला. त्यासंदर्भात काही प्रश्न उद्भवतात. ते विचारले पाहिजे असे वाटते. कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती. हे आपल्याला ज्ञात असेलच. पण, खारघरमध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

हे सुद्धा वाचा

प्रशासकीय नियोजन का केले नाही?

भारतरत्नसारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती का? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना पत्राद्वारे विचारला आहे.

राजकारण करू नका म्हणणे कितपत संयुक्तिक

श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे-फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचे राजकारण करू नका, असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.

फडणवीस यांनी कोरोनात राजकारण केले नाही का?

कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खासगी पीएम केअर फंडामध्ये निधी द्या असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?, असे काही प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत.