‘मध्यावधी निवडणुका होतीलच, कारण…’, पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Nov 06, 2022 | 3:35 PM

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यात मध्यावधी निवडणुका नक्कीच होणार असल्याचे संकेत दिले.

मध्यावधी निवडणुका होतीलच, कारण..., पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. ऋतुजा यांचा दणदणीत मतांनी विजय होत असल्याचं निश्चित झाल्यानंतर त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेल्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यात मध्यावधी निवडणुका नक्कीच होणार असल्याचे संकेत दिले.

“मध्यावधी निवडणुका होतील असं मला वाटतंय. कारण मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार मोठ्या घोषणा करतंय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “येणारे प्रत्यक्षातले प्रकल्प गुजरातला गेले. जनता उघड्या डोळ्यांनी सगळे बघतेय. जमिनीवरचे प्रकल्प गुजरातेत आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

पोटनिवडणुकीच्या विजयावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

हे सुद्धा वाचा

“मधल्या कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल निशाणी घेऊन आम्ही लढलो. मशाल भडकली आणि भगवा फडकला याचा मला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

“या विजयाचं श्रेय शिवसैनिकांना आहेच. पण आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पक्ष आणखी अनेक हितचिंतकांनी मेहनत घेतली. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो”, असं ठाकरे म्हणाले.

“लढाईची सुरुवातच विजयाने झालीय. त्यामुळे मला भविष्यातील लढाईची चिंता राहिलेली नाही. या निवडणुकीत जसं एकजुटीने हा विजय आपण खेचून घेतला तसंच पुढचा सगळा विजय खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“या निवडणुकीत आमचं ज्यांनी चिन्ह गोठवलं, ते तर आमच्या निवडणुकीच्या रिंगणात आजूबाजूला आले नाहीत. मात्र त्यांचे करतेकरवते होते त्यांनी अर्ज भरला. पण त्यांना नंतर अंदाज समजला तेव्हा त्यांनी माघार घेतली. त्यांनी जर अर्ज मागे घेतला नसता तर त्यांच्या पक्षाला नोटाची मतं गेली असती. एकूण या निवडणुकीत नोटाचा वापर झाला हे तुमच्या लक्षात आलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. कारण त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं मुर्खपणाचं ठरेल”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.