‘एसीत बसून ट्विट करणाऱ्या नेत्यासारखं नाही बनायचं’, उर्मिला मातोंडकरांचे टोमणे नेमके कुणाला?

| Updated on: Dec 24, 2020 | 5:34 PM

"काँग्रेसमध्ये जास्त दिवस न राहिल्याचा मला पश्चाताप होत नाही. पक्ष सोडला तरी मी पक्ष नेतृत्वाचा तितकाच सन्मान करते", असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या (Urmila Matondkar says I want to be leader of people)

एसीत बसून ट्विट करणाऱ्या नेत्यासारखं नाही बनायचं, उर्मिला मातोंडकरांचे टोमणे नेमके कुणाला?
Follow us on

मुंबई : “लोकांनी मला जसं अभिनेत्री म्हणून स्वीकारलं तसं मला आता लोकनेता व्हायचं आहे. लोकांसाठी काम करायचं आहे. मला धर्म, जात, भेदभावच्या पलीकडे जाऊन काम करायचं आहे. एसी रुममध्ये बसून ट्वीट करणाऱ्या नेत्यासारखं मला बनायचं नाही. मला माहिती आहे मला काय करायचं आहे आणि ते कसं करायचं. यापुढेही मी शिकत राहील”, असं शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) म्हणाल्या. त्यांनी ‘पीटीआय’ला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्द आणि पुढील वाटचालीसाठी काय नियोजन आहे, यावर भाष्य केलं (Urmila Matondkar says I want to be leader of people).

“काँग्रेसमध्ये जास्त दिवस न राहिल्याचा मला पश्चाताप होत नाही. पक्ष सोडला तरी मी पक्ष नेतृत्वाचा तितकाच सन्मान करते. मला विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी काँग्रेसकडूनही प्रस्ताव आला होता. मात्र, आपण इतक्या दिवसांपासून काँग्रेसमधून बाहेर पडलो आहोत आणि आता फक्त पदासाठी पुन्हा पक्षात जाणं मला योग्य वाटलं नाही”, असं उर्मिला यांनी सांगितलं.

“मी काँग्रेस पक्षात सहा महिन्यांपेक्षाही कमी वेळ राहिली. काँग्रेसकडून विधानपरिषदेची ऑफर आली तेव्हा मी विचार केला की, मी पक्षातून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता त्यांची ऑफर स्वीकारणं योग्य ठरणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, उर्मिला यांना काँग्रेसवर टीका का करत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना “मी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसवर कधी टीका केली नाही. मग मी आता का टीका करेन”, अशी प्रतिक्रया त्यांनी दली.

“महाविकास आघाडी सरकारचं आतापर्यंतचं कार्य खूप चांगलं आहे. कोरोना संकटाचा हा काळ खूप आव्हानात्मक होता. मात्र, सरकारकडून चांगल्याप्रकारे नियोजन करण्यात आलं”, असं मत त्यांनी मांडलं (Urmila Matondkar says I want to be leader of people).

काँग्रेस आणि शिवसेनेच्या विचारधारेत फरक आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावरदेखील त्यांनी खुल्या मनाने उत्तर दिलं. “सेक्युलरचा अर्थ असा नाही की, तुम्ही कोणत्या धर्माला मानत नाहीत. एक हिंदू असल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष कराल. शिवसेना हिंदुत्ववादी आहे. हिंदू महान धर्म आहे. हा धर्म सर्वांना सोबत घेऊन चालतो”, असं उर्मिला म्हणाल्या.

“विधानपरिषदेत मला जागा जरी नाही मिळाली तरी मी शिवसेनेसोबत काम करेन. मी शिवसेनेत कोणत्याही पदासाठी प्रवेश केलेला नाही. मी काँग्रेसमध्ये निवडणूक लढण्यासाठी प्रवेश केलेला नव्हता. मी त्यावेळीदेखील तिकीट मिळालं नसतं तरी काँग्रेसच्या फक्त प्रचाराच्या कामात खूश झाली असती”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा : शिवसेनेने वात पेटवली, भाजपच्या किसान मोर्चाला खिंडार पाडलं