‘आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार’, प्रकाश आंबेडकर यांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज

महाविकास आघाडीत जाण्यास आपण तयार आहोत, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी TV9च्या मुलाखतीत सांगितलंय. तसंच प्रकाश आंबेडकरांनी थेट पंतप्रधान मोदींनाच आव्हान दिलंय.

आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार, प्रकाश आंबेडकर यांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज
| Updated on: Feb 11, 2023 | 10:42 PM

मुंबई : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सहभागी होण्याची इच्छा नाही, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आधी काँग्रेस राष्ट्रवादीलाच इशारा दिलेला. मात्र tv9च्या मुलाखतीत, आंबेडकरांनी आता मविआत सहभागी होण्याची तयारी दाखवलीय. पण निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घ्यावा असंही वंचित प्रमुख म्हणालेत. सध्या कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक होतेय. चिंचवडमध्ये राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळं आधीच राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलंय. पण प्रकाश आंबेडकरांनी त्यात भर घातलीय. कारण राहुल कलाटेंच्याच बाजूनं वंचितचे मतदार मतदान करणार आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाशी युती केलीय. मात्र महाविकास आघाडी म्हणून लढलो तर 200 जागा आणि वंचित-ठाकरे गट दोघे मिळूनच दीडशे जागा जिंकणार असा दावाही आंबेडकरांचा आहे.

दीडशे जागांचा दावा करतानाच, आंबेडकरांनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिलंय. आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार असून कधीही मॅजिक करु शकतो असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत.

आता महत्वाचा प्रश्न हा आहे की, वंचित महाविकास आघाडीचा भागच झाली नाही. तर आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करणार का?

प्रकाश आंबेडकरांनी मविआत जाण्याची तयारी तर दर्शवलीय. आता त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोर्टात बॉल टाकलाय. त्यामुळं भविष्यात काय होतं हे दिसेलच.